Lokmat Parliamentary Awards 2018 Live : उर्जित पटेल यांनी राजीनामा देण्यास उशीर केला : पी चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:21 IST2018-12-13T17:03:27+5:302018-12-13T17:21:07+5:30
‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी मुलाखत घेतली.

Lokmat Parliamentary Awards 2018 Live : उर्जित पटेल यांनी राजीनामा देण्यास उशीर केला : पी चिदंबरम
नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कितपत स्वातंत्र्य मिळते हे येणार काळच सांगेल. पण उर्जित पटेल यांनी राजीनामा देण्यास उशीर केला. नोटबंदीच्यावेळीच 9 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला असता तर सरकार दबावाखाली आले असते, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केले.
‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची वरिष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी मुलाखत घेतली. नोटाबंदीमुळे देशात नोकऱ्या गेल्या त्या परत मिळाल्या नाहीत. गुंतवणुकही प्रभावित झालीय. यामध्ये परकीय गुंतवणुकही आली. यामुळे कोणीही सांगेल की नोटाबंदीचा निर्णय हा मूर्खपणा होता, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली. सुब्बाराव यांनी आपल्यालाही पुस्तक प्रकाशनाला बोलावले होते. सुब्बाराव यांनी आणि रघुराम राजन यांनी राजीनामा दिला नाही हा फरक तेव्हाच्या आणि आताच्या आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादामध्ये आहे. सीबीआय आमचे ऐकतेय, मग आरबीआय का ऐकत नाहीय, या मोदी सरकारच्या हेक्यामुळे आरबीआयवर ही वेळ आली. शक्तीकांत दास यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करायला हवे, ना की सरकारचा माणूस म्हणून, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
भापजला दक्षिणेकडील राज्यांमधून ताकद मिळत नाही. हीच परिस्थिती काँग्रेसचीही आहे. तेलंगानामध्ये काँग्रेसचा पराभव हा लोकसभेसाठी गृहीत धरू नये. भाजपा शेवटच्या 100 दिवसांत कमबॅक करेल आणि काँग्रेस आतापेक्षा दुप्पट प्रहार करेल, असा विश्वास पी चिदंबरम यांनी व्यक्त केला. विजय माल्ल्या हा भाजपच्या काळातच देशातून पळून गेला, आणि आता त्यांच्याच काळात परत येईल, हे चांगलेच आहे. याचा निवडणुकीशी काही संबंध नाही. हा येत्या निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही. कारण त्याला भविष्य नाही. यापेक्षा रोजगार, विकास हे प्रश्न लक्षात घ्यायला हवेत, असेही चिदंबरम यांनी सांगितले.
बरखा दत्त यांनाच राजकारणात येण्याचे निमंत्रण
राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे विचारताच चिदंबरम यांनी ही शक्यता फेटाळली. कार्यकर्त्यांची मागणी आहे की राहुल गांधी पंतप्रधान बनावेत, बसपाच्या मायावती पंतप्रधान बनाव्यात या गोष्टींना जास्त महत्व नाही. मात्र, निवडणुका झाल्यावर जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेण्यात येतात. भाजपा सत्तेत असेल तेथे प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार. बसपा, सपा यांनी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्येही देतील, असे सांगत चिदंबरम यांनी बरखा दत्त यांनाच राजकारणात येण्याचे निमंत्रण देऊन टाकले.
विरोधी पक्षांमधून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल असे विचारताच, चिदंबरम यांनी ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी स्पष्ट केले आहे, की निवडणुका झाल्यानंतरच उमेदवार ठरवण्यात येईल. यामुळे आता त्याचा प्रश्नच येत नाही.
मिडियाने काँग्रेसला हिंदुविरोधी बनविले
मिडियाने काँग्रेसची हिंदुविरोधी पक्ष म्हणून बनविली. हिंदू घरात जन्माला आला किंवा मुस्लिम घरात जन्माला आला यापेक्षा तो भारतात जन्माला आला हे महत्वाचे आहे.
श्रोत्यांकडून प्रश्नोत्तराच्या वेळी चिदंबरम यांनी नोटाबंदी, काश्मीरप्रश्न, हिंदुत्ववाद यावरील सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच एका विद्यार्थिनीच्या प्रश्नावर चिदंबरम यांनी स्वच्छ भारत सारख्या योजना यशस्वी व्हायला हव्यात, याच्या बाजुने असल्याची कबुली दिली. टॉयलेट स्वच्छ असायला हवेत. परिसर स्वच्छ असायला हवी, मात्र, विविध अहवाल पाहता हे होत नाहीय. याचे वाईट वाटते, असेही चिदंबरम म्हणाले.