महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा उच्छाद; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 08:11 IST2019-05-02T07:55:12+5:302019-05-02T08:11:34+5:30
रस्ते निर्मितीसाठी वापरली जाणारी वाहनं नक्षलवाद्यांकडून लक्ष्य

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा उच्छाद; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले
पाटणा: गडचिरोलीनंतर आता बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. गया जिल्ह्यातल्या बाराचट्टी भागात रस्ते निर्मितीच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाराचट्टीतल्या भोक्ताडीह आणि जयगीर दरम्यान बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.
काल रात्री उशिरा जवळपास 30 नक्षलवाद्यांनी तीन जेसीबी आणि एका ट्रॅक्टरला आग लावली. यानंतर नक्षली झिंदाबादच्या घोषणा देत ते घटनास्थळावरुन निघून गेले. यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नक्षलवाद्यांचा विकासकामांना विरोध असल्यानं त्यांनी रस्त्याच्या कामासाठी वापरली जाणारी वाहनं पेटवून दिली. बाराचट्टी भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या भागात आधीही अनेकदा नक्षलवाद्यांनी वाहनं जाळली आहेत.
काल गडचिरोलीत झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना आज बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला. बुधवारी (काल) जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचं पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात शहीद झालेले जवान क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे होते. या हल्ल्यात खासगी वाहनाच्या चालकाचाही मृत्यू झाला.