भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:20 IST2021-05-23T09:17:55+5:302021-05-23T09:20:42+5:30
केंद्रातील मोदी सरकारला लवकरच ७ वर्ष पूर्ण होणार; अध्यक्षांचं भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला आहे. या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्तानं कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करू नका. कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कार्यक्रम नक्की हाती घ्या, अशा सूचना नड्डा यांनी दिल्या आहेत.
काेराेनाच्या महामारीत भाजपचे वाईट राजकारण, नाना पटाेलेंचा टोला
'कोरोना संकटाच्या कठीण काळात जनतेचं दु:ख कमी करण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचं रक्षण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून तुमच्या आणि तुमच्या राज्यातील सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. या जागतिक महामारीनं आपल्या देशासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. या संकटांचा सामना सध्या आपला देश करत आहे,' असं नड्डा यांनी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
देवेेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे पॅकेजसाठी आग्रह धरावा, नवाब मलिक यांचा सल्ला
'गेल्या शतकभरात जगानं असं भयंकर संकट पाहिलेलं नाही. भारतच नव्हे, तर संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. शंभर वर्षांनंतर आलेल्या या भीषण संकटानं आपल्या अनेक जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून कायमचं दूर नेलं. आपल्या देशाला आणि समाजाला या संकटामुळे अनेक घाव झेलावे लागले. त्याच्या जखमा अद्याप कायम आहेत,' असं नड्डा यांनी पत्रात नमूद केलं आहे.
'कोरोना संकटामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कित्येकांनी त्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींना गमावलं. काही मुलांचे आई वडील कोरोनानं हिरावून नेले. अशा मुलांवर दु:खाचा किती मोठा डोंगर कोसळला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. या मुलांच्या भविष्याची चिंता करणं आणि त्यासाठी ठोस पावलं उचलणं ही आपली जबाबदारी आहे. या मुलांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना सांभाळणं हे आपलं सामाजिक कर्तव्यदेखील आहे. अशा मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी असलेल्या योजनांची माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल,' अशा शब्दांत नड्डा यांनी आई वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.