बिगर आदिवासी टाकणार निवडणुकीवर बहिष्कार?
By admin | Published: September 27, 2014 12:17 AM2014-09-27T00:17:58+5:302014-09-27T00:17:58+5:30
पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाला १०० टक्के आरक्षण जाहीर केल्याने या जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाज प्रचंड संतप्त झाले आहेत.
वाडा : पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाला १०० टक्के आरक्षण जाहीर केल्याने या जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाज प्रचंड संतप्त झाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून सरकारचे लक्ष वेधावे असा उमटत असून काही गावांनी तर आपल्या प्रवेशद्वाराजवळ बहिष्काराचे फलक लावून त्याची सुरूवात केली आहे. यामुळे पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाला नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण दिल्याचा वटहुकूम ९ जून रोजी तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण यांनी काढला. त्याची अंमलबजावणी विद्यमान राज्यपाल विद्यासागर राव करीत आहेत. यामुळे जिल्ह्यात राहणाऱ्या सुमारे ६३ टक्के बिगर आदिवासींवर अन्याय झाला असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या शनिवारी वाडा येथे छेडलेल्या तिहेरी आंदोलनात हजारोंच्या जनसमुदायाने आंदोलन छेडले होते. गावा-गावात याचीच चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)