पान १ - दुष्काळग्रस्त मुंबईत

By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:42+5:302015-09-04T22:45:42+5:30

दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत

Page 1 - Drought in Mumbai | पान १ - दुष्काळग्रस्त मुंबईत

पान १ - दुष्काळग्रस्त मुंबईत

Next
ष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत
पुलाखाली मांडला संसार : विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो कुटुंबियांचे स्थलांतर
प्राची सोनावणे
नवी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. प्यायला पाणी व हाताला काम नसल्यामुळे शेकडो दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यातील मुंबईकडे येऊ लागले आहेत. मिळेल ते काम करून अन् मिळेल तिथे मुक्काम करून आयुष्य कंठत आहेत.
सप्टेंबर सुरू झाला तरी, अद्याप राज्याच्या अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. विदर्भ, मराठवड्यात पिके उन्हामुळे करपत आहेत. पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्षही पडू लागले आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील जवळपास ४०० कुटंुबे नवी मुंबईत आली आहेत. यामधील जवळपास १०० जणांनी तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. अनेकजण नाकाकामगार म्हणून मिळेल ते काम करत आहेत. दिवसभर काम करून मिळालेल्या पैशांनी धान्य विकत घेऊन पुलाखालीच दगडाच्या चुलीवर जेवण बनविले जात आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळी संपली की विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त मुंंबईत येतात. पावसाळा सुरू झाला की गावाकडे जातात. यावर्षी पाऊसच पडला नसल्यामुळे गतवर्षी आलेल्यांनीही गावी जाणे टाळले आहे. पाऊसच नाही तर गावी जाऊन काय करणार, असे अनिल धनगरे या शेतकर्‍याने सांगितले. नाकाकामगार म्हणून तुर्भे येथे तो कामाच्या शोधात असतो.
अनेक शेतकर्‍यांनी वृद्ध आई-वडील, लहान मुलांना गावी ठेवले असून काम मिळविण्यासाठी येथे ते आले आहेत, असे शोभा बागडे म्हणाली. गावाकडील आपल्या माणसांसाठी जीव तुटत असल्याचे सांगताना तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कसे जगायचे, असा प्रश्न पडला असून आतातरी पाऊस होऊ दे, असे साकडे देवाला घातले असल्याची प्रतिक्रिया कल्पना कांबळे हिने दिली.
----------
मुलांचे विवाह रखडले
दुष्काळामुळे गावाकडे मुलांची लग्न होणेही अवघड झाले आहे. गावी उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. दुष्काळामुळे मजुरीची कामेही मिळत नाहीत. मुलगी मोठी झाली आहे. तिच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करायची आहे. त्यामुळे मिळेल ते काम करून चार पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- लता गायकवाड, यवतमाळ
-------
कर्ज फेडायचे कसे ?
लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. दुष्काळामुळे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडू लागली असल्यामुळे रोजगाराच्या शोधात मंुबईला आलो असून या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
उमाबाई गजभे, शेतकरी पुसद, यवतमाळ
------
उपाशीपोटी झोपावे लागते
गावाकडे रोजगाराचे साधन नसल्यामुळे मुंबईत आलो आहे. कामासाठी नाक्यावर उभे रहावे लागते. कधी काम मिळते, कधी मिळत नाही. कित्येक वेळा काम न मिळाल्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागत आहे. कामाच्या शोधात भटकताना गावाकडील कुटुंबियांची आठवण होते. भविष्यात तरी असा दुष्काळ पडू नये व पुन्हा रोजगाराच्या शोधात भटकंती करण्याची वेळ येऊ नये.
किसन माळी, शेतकरी, जालना
---------
मुंबईतही फरफट
मुंबईत येऊनही या दुष्काळग्रस्तांची फरफट सुरूच आहे. रहायला घर नसल्यामुळे नवी मुंबईतील तुर्भे उड्डाणपुलाखाली काहींनी आसरा घेतला आहे. दगडाची चुल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. डासांचा उपद्रव होत असल्यामुळे शेतकरी व त्यांच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकजण दिवसभर मजुरीचे काम करतात आणि रात्री झोपण्यासाठी रेल्वेस्टेशनमध्ये जात आहेत. म्हातार्‍या व्यक्ती रेल्वे स्टेशन व परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत.
------------
फोटो -
०४दुष्काळग्रस्त

Web Title: Page 1 - Drought in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.