बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:30 IST2025-04-23T14:55:44+5:302025-04-23T15:30:49+5:30
बंगळुरु येथील एका व्यक्तीचा पहलगाम हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. विविध राज्यातील हे सर्व पर्यटक होते. दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारुन पर्यटकांवर गोळ्या चालवण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष्य केले आणि महिला, मुलांना सोडून दिले. या हल्ल्यात कर्नाटकातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या शिवमोग्गा येथील रहिवासी मंजुनाथ राव आणि बंगळुरू येथील भरत भूषण अशी या मृतांची नावे आहेत.
भरत भूषण हे त्यांची पत्नी सुजाता आणि तीन वर्षांच्या मुलासोबत पहलगाममधील बेसरन परिसरात फिरायला गेला होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून भरत यांच्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. त्यांची पत्नी आणि मुलगा कसेतरी बचावले. भरत भूषण आणि त्यांचे कुटुंब १८ एप्रिल रोजी एका टूर ऑपरेटरमार्फत काश्मीरला गेले होते. ते पूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. सध्या ते डायग्नोस्टिक्स म्हणूने काम करत होते.
या घटनेनंतर भूषण यांच्या सासू विमला यांनी घटनेची माहिती दिली. "माझ्या मुलीने फोन करून आम्हाला याबाबत कळवले. ती एका आयटी कंपनीत काम करायची. तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती. तिने फोन केल्यावरच आम्हाला काय घडले ते कळालं. दहशतवाद्यांनी भरतला त्याचे आधार कार्ड दाखवण्यास सांगितले आणि ते तपासल्यानंतर त्याला मारण्यात आले. दहशतवाद्यांनी 'तुम्ही मुस्लिम आहात की हिंदू? असे विचारले आणि मग मारले. माझ्या जावयाकडे बाळ होते. त्यांनी बाळाला खाली ठेवायला लावले आणि मग जावयावर गोळ्या झाडल्या," असे विमला यांनी सांगितले.
"दहशतवाद्यांनी भारतला जर तू मुस्लिम आहेस तर आम्ही तुला सोडून देऊ असे म्हटलं. पण भरतने आधीच सांगितले गेले होते की तो हिंदू आहे, त्यामुळे मी मुस्लीम आहे असं तो कसं म्हणू शकत होता. हिंदू असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी जावयाच्या डोक्यात गोळी झाडली. ते तीन मिनिटे त्याच्यावर गोळीबार करत राहिले. तो मरेपर्यंत ते थांबले नाहीत. ते नावावरून ओळखू शकत होते. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतरही त्यांनी त्याला मारले," असेही विमला यांनी म्हटलं.
दरम्यान, शिवमोग्गा येथील मंजुनाथ राव देखील त्यांच्या पत्नी आणि मुलासह पहलगाममध्ये गेले होते. ते रिअल इस्टेट व्यापारी होते. या हल्ल्यात त्यांनाही आपला जीव गमवावा लागला.