आदिनाथ पंचकल्याणक महोत्सवाची सांगता; सोनगड येथे भगवान बाहुबलींवर महाअभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 17:49 IST2024-01-26T17:45:39+5:302024-01-26T17:49:14+5:30
Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठ दिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

आदिनाथ पंचकल्याणक महोत्सवाची सांगता; सोनगड येथे भगवान बाहुबलींवर महाअभिषेक
Lord Baahubali Munindra Panchkalyanak Mahotsav: सोनगड येथील श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठ दिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. २६ जानेवारी २०२४ रोजी एका टेकडीवर लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या बाहुबली भगवान यांच्यावर महामस्तकाभिषेक करण्यात आला. गेल्या सात दिवसांपासून विविध विधींचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन सोनगडच्या श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टने केले असून, विश्वस्त नेमिषभाई शाह हे महोत्सवाचे मुख्य निमंत्रक होते. नेमिषभाई शाह यांच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मनसुख मांडवीय यांनी विशेष हजेरी लावली. या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात प्रतिष्ठाचार्य सुभाषभाई शेठ आणि बालब्रह्मचारी हेमंतभाई गांधी यांच्यासह त्यांचे सहकाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विधी केले. १९ जानेवारी रोजी या महोत्सवाची सुरुवात झाली होती. २६ जानेवारी रोजी आदिनाथ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाची सांगता महामस्तक अभिषेकाने झाली.
सर्व जिनबिंबांना मंदिरात विधीपूर्वक विराजमान करण्यात आले
या महोत्सवात मोक्षकल्याणकचा संपूर्ण विधी स्क्रीनवर थ्रीडीमध्ये दाखवण्यात आला. पंचकल्याणक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर सर्व जिनबिंबांना मंदिरात विधीपूर्वक विराजमान करण्यात आले. बाहुबली भगवान यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुफळ संपूर्ण झाला. तसेच जंबुद्वीपमध्ये १३० देवतांचे पूजन करून स्थापना करण्यात आली. हा सोहळा प्रचंड उत्साह, आनंद आणि पावित्र्याच्या वातावरण पूर्ण झाला. या विशेष सोहळ्याला भारत देशातून तसेच परदेशातील विविध ठिकाणांहून १५ ते २० हजार भाविक उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पंचकल्याणक विधींमध्ये अनेक विधी करण्यात येतात. ज्यामुळे संसारी ते सिद्ध, अपवित्रतेकडून शुद्धता आणि अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे परमेश्वराचा प्रवास पूर्ण झाला, असे मानले जाते. जो प्रत्येक जीवासाठी आदर्श, मार्गदर्शक आणि सत्याचा प्रकाश आहे, योग्य जीव त्या अनुषंगाने आत्मसंवर्धन करून स्वतःचे कल्याण करतात, असे म्हटले जाते.