PM सुरक्षेचा विषय गंभीर, पंजाबमधील घटनेबाबत पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:51 PM2022-01-11T17:51:45+5:302022-01-11T17:53:32+5:30

पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये (Firozpur) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे मोदींना पंजाबचा दौरा अर्धवट सोडून परत दिल्लीला जावं लागलं होतं.

PM is an institution ... Sharad Pawar made it clear about the security of the Prime Minister | PM सुरक्षेचा विषय गंभीर, पंजाबमधील घटनेबाबत पवारांनी स्पष्टच सांगितलं

PM सुरक्षेचा विषय गंभीर, पंजाबमधील घटनेबाबत पवारांनी स्पष्टच सांगितलं

Next

मुंबई - देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून विशेषत: सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाच पैकी तीन राज्यांमध्ये निवडणूक लढणार असल्याचं पवार यांनी जाहीर केलं आहे. यावेळी, विविध मुद्द्यांवर आणि पत्रकारांच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तरे दिले. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेतील बिघाडाबाबतही त्यांनी भाष्य केलं.   

पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये (Firozpur) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे मोदींना पंजाबचा दौरा अर्धवट सोडून परत दिल्लीला जावं लागलं होतं. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल कऱण्यात आली होती. त्यावर, सोमवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने एक स्वतंत्र समिती नेमूण तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, हा विषय आता चौकशीसाठी प्रलंबित आहे. यासंदर्भात आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या प्रकरणाबाबत कालच सुप्रीम कोर्टाने एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. त्यातून वास्तव काय असेल ते समोर येईल. मला वाटतं, पंतप्रधानपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यासाठी केंद्र असेल किंवा राज्याने सुरक्षेची जबाबदारी घेतलीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही असेही शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विषय गंभीर असल्याचे मी मानतो, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

योगी सरकार धार्मिक तेढ निर्माण करणारं

"मी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं. त्यांनी उत्तर प्रदेशातील ८० टक्के जनता आपल्यासोबत आहे आणि केवळ २० टक्के जनता विरोधात आहे असं म्हटलं. ते २० टक्के नागरिक कोण? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. ते नेमकं कोणाबद्दल बोलत होते? राज्याचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो तो कोण्या एका गटाचा नसतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेलं सरकार बाजूला सारणं महत्त्वाचं आहे. देशात सर्वधर्मसमभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशात भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करावंच लागेल", असा एल्गार शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.  

मी उत्तर प्रदेशात जाणार - पवार

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि आणखी काही छोट्या-मोठ्या पक्षांसोबत आघाडी करुन निवडणुकीला सामोरं जाणार आहे.  मी स्वत: देखील उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. उत्तर प्रदेशात आज जनतेला बदल हवा आहे. या निवडणूकीत जनता उत्तर प्रदेशात बदल घडवून आणेल याचा विश्वास आहे", असं शरद पवार म्हणाले. 
 

Web Title: PM is an institution ... Sharad Pawar made it clear about the security of the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.