"चंद्रयान 3 वर स्वार होऊन जरी प्रचार केला तरी त्यांच्या..."; भाजपा सरकारवर 'सामना'तून टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 09:23 AM2023-08-30T09:23:33+5:302023-08-30T09:25:59+5:30

निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे

Pm Modi led BJP dictatorship will come to an end Even if they propaganda on Chandrayaan 3 says Sanjay Raut Samanaa | "चंद्रयान 3 वर स्वार होऊन जरी प्रचार केला तरी त्यांच्या..."; भाजपा सरकारवर 'सामना'तून टीकास्त्र

"चंद्रयान 3 वर स्वार होऊन जरी प्रचार केला तरी त्यांच्या..."; भाजपा सरकारवर 'सामना'तून टीकास्त्र

googlenewsNext

राज्यात शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार आल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पंतप्रधान मोदी यांच्या केंद्र सरकारवर तुफान टीका करताना दिसत आहे. तशातच भारताने नुकतीच चंद्रयान मोहिम यशस्वी करून दाखवली. मात्र भाजपाने येणाऱ्या काळात चंद्रयान 3 वरून जरी निवडणुकीचा प्रचार केला तरी त्यांना त्यात यश येणार नाही, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

वाचा सामना अग्रलेखात नक्की काय?

१४ महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हे आता ब्रह्मदेव तरी सांगू शकेल काय? हा प्रश्नच आहे. हरण्याच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा नवा ‘अ-लोकतांत्रिक’ पायंडा भाजप व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो. पण लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा प. बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे. खासगी, छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचे बुकिंग करून आपल्या राजकीय विरोधकांना कोंडीत पकडायचे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे. भाजपकडे व त्यांच्या पाठीराख्यांकडे अमर्याद साधनसंपत्ती आहे. ही संपत्ती कशा पद्धतीने येते याचे एक साधे उदाहरण आम्ही देतो.

चंद्रयानापेक्षा रस्ते बांधणीचा खर्च जास्त

‘चांद्रयान 3’ मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या 3 किलोमीटर रस्त्याचा खर्च 750 कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर 75 कोटींत व्हायला हवे ते 750 कोटींवर गेले. मग मधल्या पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? हा झाला फक्त 3 किलोमीटरचा हिशेब. त्या 3 किलोमीटरमागे 500 कोटींची फावडेबाजी करणाऱ्यांनी निवडणूक प्रचारासाठी देशातील सर्व खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवली तर त्यात नवल ते कसले?

कोणतेही बटण दाबा, मत भाजपालाच

पुन्हा भाजपचे खासदार डी. अरविंद यांनी सांगितलेच आहे की, ‘ईव्हीएम’चे कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच पडत असते. याचा अर्थ असा की, सर्व हेलिकॉप्टर्सबरोबर लाखो ‘ईव्हीएम’ही भाजपने बुक करून ठेवलीत. त्याबाबतही त्यांचा वेगळा खर्च आणि हिशेब असणारच. अर्थात तुम्ही कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यमान लोकसभेची मुदत 2024 मध्ये संपत असताना मोदी-शहा 2023 सालात निवडणुका का घेतील? याचे उत्तर सोपे आहे. सरकारच्या ज्योतिषांनी म्हणे तसा सल्ला दिला आहे. आता हे ज्योतिषी आहेत की तांत्रिक-मांत्रिक हे त्यांनाच माहीत.

इंडिया आघाडीने सत्तापरिवर्तनाचा विडा उचलला..

‘इंडिया’ आघाडीने 2024 साली देशात सत्तापरिवर्तन करण्याचा विडाच उचलला आहे. हा ‘2024’चा वाईट काळ 2023 च्या मावळतीस तंत्र-मंत्र, ईव्हीएम विद्येने नष्ट करता येईल काय? यावर म्हणे अंतस्थ गोटात खलबते सुरू आहेत. निवडणुका 2024 ला करा नाहीतर 2023 अखेरीस करा, मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग नाही व चोऱ्यामाऱ्या करून असे काही करण्याचा प्रयोग केलाच तर ते सर्व प्रकरण त्यांच्यावरच उलटेल. भाजपची हुकूमशाही कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून पायउतार होणार आहे हे नक्की. श्रीमती ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले की, भाजप जर तिसऱ्यांदा सत्तेत आला तर लोकशाहीचे पूर्ण उच्चाटन होऊन हुकूमशाही लागू केली जाईल. ममता बॅनर्जी यांची चिंता खरी आहे. मोदी-शहा व त्यांचे गुजरातच्या धनिक मित्रमंडळाने लोकशाहीचा गळा कधीच घोटला आहे. 2014 सालापासून मोदी सरकारची पावले हुकूमशाहीकडे वळू लागली होती. 2019 मध्ये त्यांनी लोकशाहीला जवळजवळ वधस्तंभावर लटकवले व आता 2024 मध्ये वधस्तंभाचा खटका ते ओढतील ही भीती आहे. पण या देशाची चिंता भारतमातेस आहे.

भारतमाता म्हणजे मोदी-शहा-अदानी नाही...

भारतमाता म्हणजे मोदी-शहा-अदानी नसून 140 कोटी जनता. ही जनता 2024 मध्ये हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करून वधस्तंभावरील लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करील. त्यासाठीच ‘इंडिया’ आघाडीने जन्म घेतला आहे. भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादास दैत्य हिरण्यकश्यपूपासून वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. दैत्य हिरण्यकश्यपूचा अंत नरसिंहाने ज्या भयंकर पद्धतीने केला तीच गत जगभरातील सर्वच हुकूमशहांची झाली. एक तर हुकूमशहांना देश सोडून पळून जावे लागले किंवा खवळलेल्या जनतेने त्यांच्या प्रासादात घुसून त्यांचा खात्मा केला. कारण लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार आहे. त्यामुळे 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे भाजपने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. आम्ही म्हणतो, त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच. ओढून-चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे.

Web Title: Pm Modi led BJP dictatorship will come to an end Even if they propaganda on Chandrayaan 3 says Sanjay Raut Samanaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.