असा असतो PM च्या सुरक्षेचा ताफा, 'टॉप सिक्युरिटी' असतानाही मोदींना आंदोलकांनी कसं रोखलं? नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:55 PM2022-01-05T18:55:03+5:302022-01-05T18:55:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. पण अचानक कार्यक्रम रद्द करावा लागला.

PM narendra modi convoy security system spg omission route | असा असतो PM च्या सुरक्षेचा ताफा, 'टॉप सिक्युरिटी' असतानाही मोदींना आंदोलकांनी कसं रोखलं? नेमकं काय घडलं वाचा...

असा असतो PM च्या सुरक्षेचा ताफा, 'टॉप सिक्युरिटी' असतानाही मोदींना आंदोलकांनी कसं रोखलं? नेमकं काय घडलं वाचा...

googlenewsNext

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. पण अचानक कार्यक्रम रद्द करावा लागला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा विमानतळावर माघारी परतत असताना आंदोलक शेतकऱ्यांनी ताफा अडवला आणि मोठा गहजब उडाला. आंदोलक शेतकऱ्यांच्या व्यत्ययामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास २० मिनिटं एका उड्डाणपुलावरच थांबून होता. या मुद्द्यावरुन जोरदार राजकारणाला सुरुवात झाली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांकडून पंजाब सरकारला धारेवर धरलं जात आहे. 

देशाच्या इतक्या महत्त्वाच्या पदाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत इतकी मोठी चूक झालीच कशी? याला पंजाब सरकार जबाबदार आहे, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयानंही संताप व्यक्त करत चन्नी सरकारकडे घटलेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे. पण पंतप्रधानांचा दौरा निश्चित होत असताना त्याआधी सुरक्षेची पूर्णपणे व्यवस्था केली जाते. ऐनवेळी कोणतीही घटना घडल्यास पर्यायी मार्गांचाही विचार दौऱ्याच्या आधीच केला जातो. मग असं असतानाही आज मोदींचा ताफा कसा रोखला गेला असा सवाल उपस्थित केला जात आहे. देशांच्या पंतप्रधानांची सुरक्षा नेमकी कशी असते हे आपण आधी जाणून घेऊयात...

देशात सर्वाधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या व्यक्तींमध्ये देशाच्या पंतप्रधानांचा समावेश होतो. भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपवर (SPG) असते. एसपीजीची स्थापना १९८८ साली करण्यात आली होती. एसपीजी एकूण ४ विभागांमध्ये काम करते. ऑपरेशन्स, ट्रेनिंग, इंटेलिजन्स अँड टूअसर् आणि अॅडमिनिस्ट्रेशन अशा चार विभागांमध्ये एसपीजीचं काम चालतं. 

पंतप्रधान बुलेटप्रूफ रेंज रोव्हर, मर्सडीज आणि बीएमडब्ल्यू ७६० एलआय या आलिशान कारमधून प्रवास करतात. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात मर्सडिज लिमोजिनचा देखील समावेश झाला आहे. Mercedes Maybach S650 Guard देखील मोदींच्या सुरक्षेत तैनात असते. ही कार अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. या कारमध्ये VR10 स्तरावरील सुरक्षा उपलब्ध आहे. कारचं आवरण अतिशय कठीण धातूचं बनवण्यात आलं आहे. कार दोन मीटर दूरवर केल्या गेलेल्या १५ किमी टीएनटी स्फोट देखील सहन करू शकते. कारवर करण्यात आलेली पॉलीकार्बोनेट कोटिंग कारमध्ये बसलेल्या व्यक्तींना स्फोटकांपासून सुरक्षित ठेवते.

पंतप्रधानांच्या ताफ्यावर गॅसनं हल्ला केला गेल्यास कारचं केबिन गॅस-सेफ चेंबरमध्ये बदललं जातं. बॅकअपसाठी कारमध्ये ऑक्सिजन सिलिंडर देखील उपलब्ध आहे. यात सेल्फ सिलिंग फ्लूल टँक देखील आहे. ज्यात कोणत्याही परिस्थितीत स्फोट होऊ शकत नाही. तसंच भू-सुरुंग, बॉम्बस्फोट सहन करण्यासाठी कारच्या खालच्या बाजूला आर्मर प्लेट्सचं आवरण लावण्यात आलं आहे. याशिवाय कारमध्ये आपत्कालीन मार्ग देखील आहे आणि कारच्या काचा बुलेट प्रूफ आहेत. 

ताफ्यात चालत असतात दोन डमी कार
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात ते ज्या कारमध्ये बसून प्रवास करत असतात त्याच पद्धतीच्या दोन आणखी डमी कार देखील ताफ्यात चालत असतात. जेणेकरुन पंतप्रधान मोदी नेमकं कोणत्या कारमध्ये आहेत याची माहिती हल्लेखोरांना कळू शकत नाही. याशिवाय जॅमर देखील ताफ्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. जॅमर म्हणजे एका कारच्या छतावर बऱ्याच अँटिना लावलेल्या असतात. या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरावर ठेवण्यात आलेले कोणतेही विस्फोटक निष्क्रिय करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये असते. ताफ्यात समाविष्ट असलेल्या सर्व वाहनांमध्ये एनएसजीचे निष्णात कमांडो तैनात असतात. पंतप्रधानांच्या ताफ्यात जवळपास १०० हून अधिक सुरक्षारक्षकांचा समावेश असतो. 

पंतप्रधान जेव्हा दिल्ली किंवा इतर कोणत्याही राज्यांमध्ये जातात तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची मार्ग जवळपास ७ तास आधीच निश्चित केला जातो. याशिवाय काही पर्यायी मार्ग देखील निर्धारित केले जातात. त्या मार्गिकेवर आधी रंगीत तालिम देखील केली जाते. दौऱ्याच्या दिवशी चार ते पाच तास आधी संबंधित रस्त्यावर दर ५० ते १०० मीटरच्या अंतरावर पोलीस कर्मचारी देखील तैनात असतात. पंतप्रधान येण्याच्या १० मिनिटं आधी संबंधित रस्ता पूर्णपणे रिकामी केला जातो. सामान्य रहदारी देखील पूर्णपणे बंद केली जाते. स्थानिक पोलीस रस्त्याच्या दुतर्फा तैनात असतात. 

नेमकं काय घडलं?
पंजाबच्या फिरोजपूर येथे पंतप्रधान मोदींची रॅली होणार होती. पण ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सुरुवातीला रॅली रद्द होण्यामागे पावसाचं कारण देण्यात आले. परंतु आता रॅली रद्द होण्यामागे सुरक्षेचं कारण देण्यात आले आहे. गृह मंत्रालयाकडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले असून पंजाब सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलंय की, पंतप्रधान मोदी सकाळी भटिंडाला पोहचले होते. त्याठिकाणाहून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते.

मात्र पाऊस आणि खराब वातावरणामुळे पंतप्रधान मोदींना २० मिनिटं वाट पाहावी लागली. त्यानंतरही वातावरण तसेच राहिल्याने रस्ते मार्गाने मोदींनी जाण्याचा निर्णय घेतला. रस्ते मार्गाने जाण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार होता. त्याबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेसाठी मंजुरी घेतली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा राष्ट्रीय स्मारकाच्या ३० किमी अंतरावर होता. तेव्हा रस्त्यात असणाऱ्या उड्डाणपूलावर मोदींचा ताफा पोहचला तेव्हा अचानक रस्त्यावर शेतकऱ्यांनी ताफा रोखला. या उड्डाणपूलावर जवळपास १५-२० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयाने सांगितले.

Web Title: PM narendra modi convoy security system spg omission route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.