BSNLमध्ये १ हजार नोकऱ्या; महाराष्ट्रभरात भरती, पुण्यात सर्वाधिक जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 10:41 IST2020-02-20T03:56:13+5:302020-02-20T10:41:02+5:30
राज्यात १,१६३ जणांची नियुक्ती : कामावर परिणाम झाल्याने निर्णय

BSNLमध्ये १ हजार नोकऱ्या; महाराष्ट्रभरात भरती, पुण्यात सर्वाधिक जागा
खलील गिरकर
मुंबई : तोट्यात गेलेल्या बीएसएनएलने आर्थिक भार कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली असताना कंत्राटी नोकरभरती करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ३१ जानेवारीला ८,५४४ कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सेवानिवृत्तीचा कामावर परिणाम झाल्याने अवघ्या २० दिवसांत तातडीची उपाययोजना म्हणून राज्यात १,१६३ कर्मचाऱ्यांची तातडीने कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे.
स्वेच्छानिवृत्तीचा फटका बीएसएनएलच्या राज्यभरातील कामाला बसू लागला असल्याने, प्रशासनाने राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये व गोव्यात तातडीने १,१६३ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. ही भरती ३० एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी असून, तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाईल. त्यानंतर, राज्यभरातील कामाचा व कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेचा आढावा घेऊन नेमकी किती कर्मचाऱ्यांची भरती करायची, याचा निर्णय घेतला जाईल व त्याप्रमाणे, निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट पद्धतीने भरती केली जाईल. बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक (प्रशासन) के.एच.मोरे यांच्या स्वाक्षरीने हे निर्देश देण्यात आले आहेत. बीएसएनएलची सेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत बीएसएनएलची सेवा नसल्याने मुंबईत या टप्प्यात कोणतीही भरती करण्यात येणार नाही. मात्र, गरज भासल्यास पुढील टप्प्यात भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगण्यात आले.
राज्यात सर्वाधिक ११० जणांची भरती पुण्यात करण्यात येईल, तर सोलापूरमध्ये सर्वात कमी १३ जणांची भरती होईल.
कुठे किती जणांची गरज ?
पुणे- ११०, अहमदनगर- ७५,अकोला- ५५, अमरावती- ५५, औरंगाबाद- ६३, भंडारा- २४, बीड- १८, बुलडाणा- २५, चंद्रपूर- २२, धुळे- ४५, गडचिरोली- ३२, जळगाव- ५०, जालना- २४, कल्याण- ७५, कोल्हापूर- ५०, लातूर- २४, नागपूर- ५०, नांदेड- २९, नाशिक- ७५, उस्मानाबाद- २५, परभणी- २४, रायगड- ३०, रत्नागिरी- ३६, सांगली- २०, सातारा- २०, सिंधुदुर्ग- ४०, सोलापूर- १३, वर्धा- १४, यवतमाळ- २० व गोवा- २०
स्वेच्छानिवृत्त कर्मचारी : देशात ३१ जानेवारीला बीएसएनएलच्या १ लाख ५३ हजार ७८६ कर्मचाऱ्यांपैकी ७८ हजार ५६९ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. महाराष्ट्रातील १३ हजार ६७२ कर्मचाऱ्यांपैकी ८,५४४ जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने ५,१२८ जण कार्यरत आहेत.