व्यर्थ न हो बलिदान ! शहीद परमजीत सिंग यांना अखेरचा सलाम

By admin | Published: May 2, 2017 02:50 PM2017-05-02T14:50:08+5:302017-05-02T14:50:08+5:30

पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटीमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेले नायब सुभेदार परमजीत सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Sacrifice is not worthless! The last salute to Shaheed Paramjit Singh | व्यर्थ न हो बलिदान ! शहीद परमजीत सिंग यांना अखेरचा सलाम

व्यर्थ न हो बलिदान ! शहीद परमजीत सिंग यांना अखेरचा सलाम

Next
>ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 2 - पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटीमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेले नायब सुभेदार परमजीत सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तरनतारनमधील येथील मूळी गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात शहीद जवानाला निरोप देण्यात आला. शहीद जवान परमजीत सिंग यांना अखेरचा सलाम करण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या मूळ गावी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. 
 
दरम्यान, यापूर्वी शहीद परमजीत सिंग यांच्या पत्नीनं अंत्यसंस्कार करण्यात नकार दिला होता. "जोपर्यंत संपूर्ण पार्थिव आणून देत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही", अशी भूमिका त्यांनी स्वीकारली होती. 
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग भेटायला येणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असंही परमजीत सिंग यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या. अखेर अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर सिंग कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.
 
(जवानांच्या मृतदेहांची विटंबना)
 
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत २५० मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या जवानांनी सोमवारी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आल्याचे वृत्त आहे.
(पाकच्या अमानुष कृत्याला चोख उत्तर द्या, सरकारकडून लष्कराला सर्वाधिकार)
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला.
 
या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या २००व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले तर राजेंद्रसिंग नामक जवान जखमी झाला. पाकच्या जवानांनी नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते. या हल्ल्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे सोमवारी काश्मीरमध्ये होते. त्यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. 
 
तसेच पुढील रणनीतीची चर्चा केल्याचे समजते. जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणे ही अमानुषता असून, भारतीय सशस्त्र दल या अमानुष कृत्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला. तर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत तोफगोळ्यांचा मारा करीत प्रत्युत्तर दिले. योग्यवेळी योग्य ठिकाणी या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असे नॉदर्न कमांडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 
महिन्यात सात घटना
 
पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि राजौरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या महिनाभरात सात वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. १९ एप्रिलला पूंछमध्ये १७ एप्रिलला नौशेराच्या चौक्यांवर तोफांचा मारा केला होता. याशिवाय भीमभर गली सेक्टर, बालाकोटे आणि (दिगवार) पूंछमध्येही गोळीबार केला होता.
 
पाक जवान, अतिरेक्यांकडून गोळीबार
 
पाकिस्तानने आधी रॉकेट आणि शस्त्रांनिशी हल्ला केला. बॅट आणि अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केल्यानंतर दोन शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. अतिरेकी घुसखोरी करतात त्या वेळी बॅटकडून मोठा हल्ला केला जातो. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी भेट दिलेल्या स्थळापासून ३० किमी अंतरावर ही घटना घडली.
(भारताचे चोख प्रत्युत्तर, 7 पाकिस्तानी सैनिक ठार)
 
गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती...
 
गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी  मनदीप सिंग या भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. मच्छेल सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात मनदीप सिंग शहीद झाले होते.
 
जून २००८मध्ये गोरखा रायफल्सच्या एका जवानाला पकडण्यात आल्यानंतर त्याचे शीर कापून फेकण्यात आले होते. २०१३मध्ये लान्सनायक हेमराज आणि सुधाकर सिंग या दोन जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. कारगील युद्धाच्या वेळी कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृतदेह विद्रूप केला होता.

Web Title: Sacrifice is not worthless! The last salute to Shaheed Paramjit Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.