सांगली जिल्ह्यात आघाडी, महायुती तुटल्याने चौरंगी, पंचरंगी लढती

By Admin | Published: September 25, 2014 11:54 PM2014-09-25T23:54:56+5:302014-09-25T23:58:59+5:30

आता शोध तुल्यबळ उमेदवारांचा!

In Sangli district, Mahayuti broke down, Chowringhee and Panchrangi clash | सांगली जिल्ह्यात आघाडी, महायुती तुटल्याने चौरंगी, पंचरंगी लढती

सांगली जिल्ह्यात आघाडी, महायुती तुटल्याने चौरंगी, पंचरंगी लढती

googlenewsNext

सांगली : भाजप-शिवसेनेची महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीतील पक्षांना जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत एकमेकांचा आधार होता. पण आता तोच तुटल्याने उसन्या उमेदवारांवरच त्यांची भिस्त राहणार आहे. यात सर्वांत मोठी गोची शिवसेनेची झाली असून, त्यांना पाच जागांवर उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची स्थितीही किमान दोन मतदारसंघात बिकट आहे. याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार असून, जिल्ह्यात चौरंगी, पंचरंगी लढतींची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील आठही मतदारसंघात भाजप, शिवसेनेची स्वबळावर लढण्याइतपत ताकद नाही, तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवारांची वानवा आहे. सध्या जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक म्हणजे तीन, तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीकडे दोन जागांसह एक सहयोगी आमदार आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संजय पाटील यांनी बाजी मारली होती. मोदी लाटेचा फायदा विधानसभा निवडणुकीत उचलण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेमध्ये उडी घेतली आहे. आता महायुतीसह आघाडीही तुटल्याने या नेत्यांची कोंडी झाली आहे. सांगली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मदन पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर भाजपच्या उमेदवारीचा घोळ कायम आहे. त्यात युती तुटल्याने आता शिवसेनेचे बजरंग पाटील मैदानात येऊ शकतात. मात्र युतीतील मतविभागणीचा फटका भाजपला बसू शकतो. सांगलीतील राष्ट्रवादीने नेहमीच भाजपला छुपी मदत केली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला मिळणारी राष्ट्रवादीची रसद बंद होईल. राष्ट्रवादीकडून दिनकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल. मिरजेत शिवसेनेकडे उमेदवार नसला तरी, हा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी विधानसभा निवडणुकांत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. आता येथे शिवसेनेला उमेदवार आयात करावा लागेल. काँग्रेस व राष्ट्रवादीत मिरजेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवरून नाराज बंडाच्या तयारीत आहेत. त्यांना राष्ट्रवादीचा आधार मिळू शकतो. येथे राष्ट्रवादीकडे स्वत:चा तुल्यबळ उमेदवार नसल्याचे चित्र आहे.इस्लामपुरात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या प्रयत्नाला, युती व आघाडी तुटल्याने खो बसला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेले जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार शिवसेनेकडून, तर भाजप-स्वाभिमानीच्या युतीतून नानासाहेब महाडिक यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. त्यात काँग्रेसला तगड्या उमेदवाराची अडचण आहे. काँग्रेसकडून हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांना धक्का देण्याचा मनसुबा महायुतीने आखला होता. त्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना भाजपची उमेदवारीही निश्चित करण्यात आली, पण नुकतेच शिवसेनेत गेलेले जयसिंगराव शेंडगे किंवा दिनकर पाटील रिंगणात उतरणार असल्याने महायुतीची ताकद विभागली आहे. काँग्रेसला तर उमेदवार शोधावा लागणार आहे. काँग्रेसकडून तासगाव तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांना संधी मिळू शकते. खानापुरात राष्ट्रवादीची साथ सोडून शिवधनुष्य हाती घेतलेल्या अनिल बाबर यांची मोठी कोंडी झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे गोपीचंद पडळकर आता भाजप-रासप युतीकडून लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनाही भाजपकडून ‘आॅफर’ मिळू शकते. आघाडी तुटल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांच्यापुढे चौघांचे आव्हान उभे राहणार आहे. जतमध्ये शिवसेनेकडे उमेदवार नाही. भाजपमध्ये उमेदवारीवरून विलासराव जगताप की, आ. प्रकाश शेंडगे यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीत नाराजांची संख्या अधिक आहे. हे नाराज शिवसेनेकडे जाऊ शकतात. जगतापांना भाजपची उमेदवारी मिळल्यास आ. शेंडगे काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यामुळे विक्रम सावंत, सुरेश शिंदे या प्रबळ दावेदारांची पंचाईत होईल. राष्ट्रवादीला माजी आमदार रमेश शेंडगे, प्रभाकर जाधव, चन्नाप्पा होर्तीकर यांच्यापैकी एकाचा विचार करावा लागेल.स्वाभिमानी संघटना व भाजप एकत्र असल्याने शिराळ्यात या दोन्ही पक्षांपैकी एकाच्या चिन्हावर शिवाजीराव नाईक मैदानात उतरतील. शिवसेनेकडे उमेदवार नसल्याने त्यांना उपऱ्या उमेदवारांवर अवलंबून रहावे लागणार आहे. काँग्रेसकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे. (प्रतिनिधी)

भाजपच्या वाटेवरील नेत्यांची कोंडी
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात महायुतीची लाट तयार झाली होती. या लाटेवर स्वार होण्याची आणि आमदारकीची स्वप्ने काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकांनी पाहिली. मात्र आता काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडीच तुटल्याने या नेत्यांची कोंडी झाली आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीसाठी भाजपला जवळ केले. त्यांनी आज अर्ज दाखल केला. आता राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असल्याने त्यांची गोची झाली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या अनिल बाबर यांचीही अवस्था तशीच आहे. अजितराव घोरपडे मात्र भाजपकडूनच मैदानात उतरणार आहेत. परतीचे दोर कापल्याने काहींची पंचाईत झाली आहे.

चौरंगी, पंचरंगी आणि बहुरंगीही...
महायुती आणि आघाडी तुटल्याने सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघात चौरंगी, पंचरंगी आणि बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. सांगली शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे अशा प्रमुख पक्षांची पंचरंगी लढत होऊ शकते. मिरजेत बहुरंगी लढतीचे चित्र आहे. याठिकाणी या चारही पक्षांशिवाय एमआयएम व अपक्षही मैदानात उतरणार आहेत. शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने याठिकाणी चौरंगी लढत होईल. इस्लामपूर मतदारसंघात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय झाला असल्याने, ऐनवेळी काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीही याठिकाणी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. जतमध्ये पंचरंगी किंवा बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. याठिकाणी पाच पक्षांबरोबरच काही अपक्षही अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

येथे आहे तुल्यबळ उमेदवारांची अडचण...
काँग्रेस : इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ
राष्ट्रवादी : पलूस-कडेगाव, जत, मिरज
भाजप : खानापूर (रासपला जागा देणे शक्य), इस्लामपूर (स्वाभिमानीला जागा देणे शक्य)
शिवसेना : पलूस-कडेगाव, इस्लामपूर, मिरज, जत, सांगली

सांगलीत इच्छुकांची कोंडी
लोकसभा निवडणुकीवेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसला मदतीचा हात दिला होता. त्याचा पैरा काँग्रेस कसा फेडणार, असा प्रश्न आहे. सांगलीत राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण सरसावले होते. आता राष्ट्रवादीच मैदानात उतरणार असल्याने या इच्छुकांची कोंडी झाली आहे.

पृथ्वीराज देशमुख यांचे काय?
पृथ्वीराज देशमुख यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अजूनही सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचल्यास पलूस-कडेगावमध्ये भाजपकडे वजनदार उमेदवार शिल्लक राहणार नाही. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संदीप राजोबांना पाठिंबा द्यावा लागेल.

नेते म्हणतात...
आम्ही लगेचच बैठक घेऊन शुक्रवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी तयार करून शनिवारी सर्व ठिकाणचे अर्ज दाखल करू. जिल्ह्यात ताकदीने आम्ही निवडणूक लढवू
- विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवाद

जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघात आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे स्वबळावर आम्ही जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकू शकतो, याची खात्री आहे.
- विश्वजित कदम, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस

राज्याबरोबरच सांगली जिल्ह्यातही भाजपला चांगले वातावरण आहे. घटकपक्षांचा विचार करून आम्ही सर्व जागा ताकदीने लढवू. उमेदवारीबाबत आमची कोणतीही अडचण नाही. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत.
- शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

सांगली जिल्ह्यातील आठही जागांसाठी शिवसेनेने यापूर्वीच तयारी केली आहे. मुलाखतीही पार पडल्या आहेत. स्वबळावर लढून जिल्ह्यात किमान चार ठिकाणी आमचे उमेदवार विजयी होतील, याची खात्री आहे.
- आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

पलूस-कडेगावमध्ये भाजपसह राष्ट्रवादीची कोंडी होणार आहे. हा मतदारसंघ स्वाभिमानी की भाजप, असा तिढा कायम आहे. भाजपकडून पृथ्वीराज देशमुख, तर स्वाभिमानीकडून संदीप राजोबा इच्छुक आहेत. त्यात शिवसेनेकडे तगडा उमेदवार नाही. शिवसेनेच्या तिकिटावर उपरा उमेदवार रिंगणात आल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो. पृथ्वीराज देशमुख यांच्यापुढे भाजप की राष्ट्रवादी, असा पेच निर्माण झाला आहे. ते भाजपकडून उतरल्यास राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार आहे. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादीपासून दुरावल्याने पक्षाकडे ताकदवान नेता राहिलेला नाही.

Web Title: In Sangli district, Mahayuti broke down, Chowringhee and Panchrangi clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.