शिक्षण सुटले, हाती आले काम! राज्यात बालकामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ; ‘क्राय’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:50 AM2022-06-16T06:50:18+5:302022-06-16T06:50:51+5:30

गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या महामारी आणि त्यानंतरच्या संचारबंदीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे.

Significant increase in the number of child laborers in the state Cry report | शिक्षण सुटले, हाती आले काम! राज्यात बालकामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ; ‘क्राय’चा अहवाल

शिक्षण सुटले, हाती आले काम! राज्यात बालकामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ; ‘क्राय’चा अहवाल

Next

मुंबई :

गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या महामारी आणि त्यानंतरच्या संचारबंदीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे. बाल हक्क स्वयंसेवी संस्था, बाल हक्क आणि क्राय या सेवाभावी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या काळात शेती तसेच इतर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मुलांचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात आढळून आले. हे प्रमाण ग्रामीण भागात लक्षणीय असून, मुंबईसारख्या शहरी भागातही बालमजूर ८ ते १२ तास काम करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

क्राय या सेवाभावी संस्थेने राज्याच्या जालना, अहमदनगर, लातूर, वर्धा, नंदुरबार, परभणी या सहा जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील बालकामगारांचा एकूण आकडा २०२० मध्ये दोन हजार ५५६ वरून २०२१ मध्ये तीन हजार ३५६वर गेला आहे. सध्या २०२२ मध्ये हीच आकडेवारी तीन हजार ३०९ आहे. शाळा बंद होणे, ऑनलाइन वर्गांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाइल फोनचा अभाव, नोकरी गमावल्यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण तसेच सरकारी बससेवेच्या प्रदीर्घ संपामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाल्याचे दिसून आल्याचे निरीक्षण या संस्थेचे संचालक क्रियान रबाडी यांनी नोंदविले.

शिक्षण सुटल्याने घरकामाचा भार
ग्रामीण भागातील परिस्थितीप्रमाणे शहरी भागातील परिस्थितीही फार वेगळी नाही. सर्वेक्षणादरम्यान वांद्रेच्या राहुल नगर, सायन कोळीवाडा आणि मानखुर्दच्या चित्ता कॅम्पमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील ५८९ मुलांपैकी १४५ मुले सध्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेली असून, त्यापैकी ८४ मुली स्वयंपाक, झाडू मारणे, कपडे आणि भांडी धुणे आणि वृद्ध किंवा लहानग्यांची काळजी घेणे अशा घरकामात गुंतलेले असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणात प्रतिसाद दिलेल्या ८४ टक्के लोकांमधील ६४ टक्के लोकांना आर्थिक परिस्थिती व पैशाअभावी मुलांना कामे करण्यासाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे ३५ टक्के लोकांनी वाढते बालकामगार हा चिंतेचा विषय असल्याचे मत संस्थेकडे नोंदविले आहे.

काम करणाऱ्या मुलांबाबतची काही निरीक्षणे पुढीलप्रमाणे
>> अनेकदा पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, शुल्क भरणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या मिळकतींचा उपयोग होत असला तरीही चिंताजनक बाब म्हणजे, काही मुले त्यांची कमाई तंबाखूजन्य उत्पादनांवर खर्च करतात, असे दिसून आले आहे.

>> कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा भार जाणवून, १०० ते ५०० रुपयांसाठी मुलांनी शाळेत जाण्याऐवजी काम करणे पसंत केले आहे.

>>  शेतीतील रासायनिक खतांमुळे व औषधांमुळे काही मुलांना त्रास झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

>>   मुले कामानिमित्त शेजारच्या शहरात स्थलांतरित होतात. मुंबई, पुणे, दौंड, बीड, मनमाड, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये घरकामगार, भिकारी, मजूर म्हणून ही मुले अनेकदा वाढपी किंवा वीटभट्टी मजुरीचे काम करतात. ऊसतोडणी, सिंचन, शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लागवड, आंतरपीक, मळणी, फवारणी आदी कामांमुळे अनेकजण स्थलांतर करतात. 

आर्थिक परिस्थिती व वाईट सवयीच्या विळख्यात अडकून या काळात एक पिढी बालमजुरीच्या चक्रात अडकत चालली आहे. ती शिक्षणापासून दूर होत आहे. याचसाठी बालमजुरी आणि त्याचे मुलांवर होणारे हानिकारक परिणाम या विषयांवर मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याची 
गरज आहे.
- क्रियान रबाडी, संचालक, क्राय (पश्चिम विभाग)

Web Title: Significant increase in the number of child laborers in the state Cry report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.