…म्हणून AIADMK ने एनडीए सोडली, पण भाजपालाही दिसतोय फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:10 IST2023-09-26T16:06:47+5:302023-09-26T16:10:58+5:30
Tamil Nadu Politics: २०२४ ची लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असतानाच अण्णा द्रमुक पक्षाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

…म्हणून AIADMK ने एनडीए सोडली, पण भाजपालाही दिसतोय फायदा
२०२४ ची लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असतानाच अण्णा द्रमुक पक्षाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाने एआयएडीएमकेच्या मागणीनुसार अन्नामलाई यांना पदावरून हटवण्यास किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे एआयएडीएमकेने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
अण्णा द्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन अण्णामलाई यांना पदावरून हटवण्याची किंवा त्यांच्यावर नियंत्रण आणण्याची मागणी केली होती. मात्र भाजपा नेतृत्वाने त्यांची मागणी साफ धुडकावून लावली होती. त्यामुळे भाजपा नेतृत्वाने आपल्या पक्षाच्या संस्थापकांचा अपमान केल्याची तक्रार करत एआयएडीएमकेने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, भाजपाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, पक्ष अन्नामलाई यांच्या पाठीमागे उभा आहे. अन्नामलाई सध्या तामिळनाडूमध्ये एन मन, एन मक्कल यात्रेचं नेतृत्व करत आहेत. तसेच पक्षाचा जनाधार वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, भाजपा नेत्यांना या प्रकरणी अधिकृतपणे काही न बोलण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
मात्र काही भाजपा नेत्यांना एआयआएडीएमकेसोबतची युती तुटल्याने त्यामधून आशेचा एक किरण दिसत आहे. एआयएडीएमकेसोबतची युती तुटल्याने भाजपाला तामिळनाडूमध्ये आपले पाय रोवण्याची आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याची संधी मिळाली आहे.