उपाशी राहिली पण हार नाही मानली; मुलाच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी वृद्ध आईला मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:05 PM2023-11-17T16:05:47+5:302023-11-17T16:13:34+5:30

अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर वृद्ध महिलेला आपल्या मुलाच्या मृत्यूची भरपाई मिळवण्यात यश आलं आहे. 

son died in road accident spent 14 years in court now got insurance compensation | उपाशी राहिली पण हार नाही मानली; मुलाच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी वृद्ध आईला मिळाला न्याय

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या हरदोई येथील एका वृद्ध महिलेच्या संघर्षाची गोष्ट सध्या चर्चेत आहे. घरातील कमावत्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर तिने 14 वर्षे नुकसानभरपाईसाठी कायदेशीर लढा दिला. पतीच्या निधनानंतरही तिने हार मानली नाही. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर वृद्ध महिलेला आपल्या मुलाच्या मृत्यूची भरपाई मिळवण्यात यश आलं आहे. 

लक्ष्मी पुरवा येथे राहणारा विपीन कुमार हा ट्रक चालक म्हणून काम करायचा. 3 जुलै 2009 रोजी विपीन घरातून फारुखाबादला गेला. तेथून तो ट्रक घेऊन बनारसच्या दिशेने जात असताना भडोही येथील औरई पोलीस स्टेशन हद्दीजवळ ट्रकचा टायर अचानक फुटला. ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्यावरच उलटला. या अपघातात विपीनचा मृत्यू झाला.

घरातील कमावत्या मुलाचा मृत्यू

घरच्या कमावत्या मुलाच्या मृत्यूनंतर घर चालवण्याची जबाबदारी विपीनच्या वृद्ध वडिलांवर आली. मुलाच्या मृत्यूनंतर वडील रामकुमार आजारी पडले. ऑपरेशनसाठी त्यांना शहरातील घर विकावं लागलं. त्यानंतर रामकुमार जिगनिया खुर्द गावात सासरच्या घरी आले. जिथे रामकुमार आणि त्यांचा मुलगा सुरेश हे मजूर म्हणून काम करू लागले. रामकुमार यांनी वकील छोटेलाल गौतम यांच्यामार्फत विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. 

विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यात रस दाखवला नाही. त्यावर कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी विमा कंपनीविरुद्ध कामगार नुकसानभरपाई कायद्यान्वये डीएमच्या न्यायालयात खटला दाखल केला. ज्यासाठी रामकुमार कोर्टात फेऱ्या मारत राहिले. रामकुमारसोबत त्यांची पत्नी रामदेवीही सुनावणीसाठी कोर्टात पोहोचत असे. मात्र सुनावणी होऊनही कोणताही निकाल लागला नाही. रामकुमार यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर खटला लढवण्याची जबाबदारी रामदेवींवर आली. 

हिंमत हारली नाही

रामदेवी यांनी हिंमत हारली नाही आणि खटल्याच्या सुनावणीसाठी त्या नियमितपणे न्यायालयात येत राहिल्या. कधी कधी त्या कित्येक किलोमीटर पायी चालत जायच्या. अगदी उपाशी देखील राहिल्या. रामदेवी तारखांना यायच्या आणि मुलगा सुरेश हा मजूर म्हणून कामाला जायचा. जेणेकरून संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करता येईल. कारण, कुटुंब अत्यंत गरीब आहे.

सरकारकडून प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. ज्यावर हरदोईचे डीएम खासदार सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला. खटल्यातील पुरावे आणि रामदेवीचे वकील छोटेलाल गौतम आणि विमा कंपनीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीला नुकसान भरपाईची रक्कम 6 टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. त्यानंतर विमा कंपनीने तब्बल 14 वर्षांनंतर विपीनची आई रामदेवी यांना 4 लाख 16 हजार 167 रुपये दिले.
 

Web Title: son died in road accident spent 14 years in court now got insurance compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.