टोकन घेण्यासाठी एकाच वेळी आले ४ हजार लोक; तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 07:53 IST2025-01-09T07:52:28+5:302025-01-09T07:53:30+5:30
तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी दरम्यान सहा भाविकांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत.

टोकन घेण्यासाठी एकाच वेळी आले ४ हजार लोक; तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू
Tirupati Balaji Temple Stampede :आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले. ४००० हून अधिक भाविक उपस्थितीत असताना ही चेंगराचेंगरी झाली. वैकुंठ एकादशीचे टोकन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एक दिवस आधीपासून रांगेत उभे राहिले होते. मात्र प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा बळी गेला. या घटनेनंतरही हजारो भाविक टोकन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह 6 जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुईया सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिकिटांसाठी ९१ काउंटर उघडण्यात आले होते. काउंटरजवळ चार हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे होते. त्यांना बैरागी पट्टिडा पार्कमध्ये रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले होते. टोकन मिळवण्याच्या नादात गोंधळ उडाला आणि लोक पळताना एकमेकांच्या अंगावरुन धावून गेले. या घटनेत मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
१० ते १९ जानेवारी या कालावधीत वैकुंठ एकादशीला वैकुंठद्वार दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. पहाटे ४.३० वाजल्यापासून दर्शन सुरू होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून सर्व दर्शन सुरू होईल. त्यासाठी टोकन घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते. या १० दिवसांत सुमारे ७ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये गोंधळादरम्यान लोक एकमेकांना ढकलत असताना दिसत आहेत. तर पोलिस अधिकारी गर्दीचे व्यवस्थापन करताना दिसत आहेत. इतर व्हिडिओंमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर जखमी भाविकांवर पोलीस सीपीआर देताना दिसत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काउंटरवर टोकन घेताना सुमारे ६० लोक एकमेकांवर पडले. प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. काही भाविकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी या घटनेमागे कोणताही कट असल्याचा नकार दिला आहे. हा अपघात असल्याचे त्यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोनवरून परिस्थितीची माहिती घेतली आणि घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील. ते गुरुवारी तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.