सुनंदा पुष्करचा मृत्यू विषप्रयोगाने नव्हे -एफबीआय
By admin | Published: November 12, 2015 03:26 AM2015-11-12T03:26:40+5:302015-11-12T03:26:40+5:30
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषाने किंवा कोणत्याही किरणोत्सारामुळे झाला नसल्याचा दावा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या संस्थेने केला आहे
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषाने किंवा कोणत्याही किरणोत्सारामुळे झाला नसल्याचा दावा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या संस्थेने केला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा तपासण्यासाठी एफबीआयकडे दिला होता. सुनंदा पुष्कर काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी होत. १७ जानेवारी २१०४ रोजी सुनंदा यांचा मृतदेह दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात आढळला होता.
नऊ महिन्यांनंतर एफबीआयने तपासणी अहवाल दिल्ली पोलिसांना सुपुर्द केला असून, या अहवालात त्यांच्या व्हिसेऱ्यातील नमुने सुरक्षा मापदंडाच्या आत होते तसेच अॅलर्जीमुळे विष पसरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा सिद्धांतही एफबीआयने फेटाळून लावला आहे. व्हिसेराचे नमुने फेब्रुवारीत एफबीआयच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हा अहवाल जाहीर करताना दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी सांगितले की, सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात पुढची कारवाई करण्याआधी वॉशिंग्टनस्थित प्रयोगशाळेचा अहवाल एका वैद्यकीय मंडळाला शहानिशा करण्यासाठी दिला जाईल. डॉक्टरांनी या अहवालाचे परीक्षण केल्यानंतरच त्यांच्या मृत्यूच्या कारणांबाबतचे संकेत मिळतील, असे बस्सी यांनी पत्रकारांना सांगितले.
व्हिसेऱ्यातील नमुन्यातील किरणोत्साराबाबत विचारले असता बस्सी यांनी सांगितले की, ते सुरक्षा मापदंडाच्या आत होते. या अहवालाचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालाला जोडला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
-------
चौकट-
एम्सचे तज्ज्ञ म्हणतात, विषप्रयोगच !
शरीरात विष पसरल्यानेच सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला, असे एम्सच्या वैद्यकीय मंडळाचे म्हणणे होते. तथापि, या विषारी पदार्थाचे नाव मात्र वैद्यकीय मंडळाने सांगितले नव्हते. एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख सुधीर गुप्ता मात्र विषामुळेच सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाल्याच्या मतावर कायम आहेत.
---
१७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्याच्या एक दिवस आधी त्यांचा टिष्ट्वटरवर पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी वाद झाला होता.