‘स्वाभिमानी’ची भाजपाविरोधात बंडखोरी
By admin | Published: September 29, 2014 07:18 AM2014-09-29T07:18:55+5:302014-09-29T07:18:55+5:30
जागा वाटपात श्रीरामपूर मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आला असतानाही भाजपाने अचानक भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिल्याने ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज झाले
अहमदनगर : जागा वाटपात श्रीरामपूर मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आला असतानाही भाजपाने अचानक भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिल्याने ‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत़ जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात भाजपाविरोधात भूमिका घेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पालवे यांनी पत्रकार परिषदेत दिला़
श्रीरामपूर, नेवासा व राहुरी मतदारसंघात भाजपाविरोधात बंडखोरी करणार असल्याचेही पालवे यांनी स्पष्ट केले़ जागा वाटपात श्रीरामपूर मतदारसंघ स्वाभिमानी संघटनेला मिळाला होता़ संघटनेने बाळासाहेब जाधव यांची उमेदवारीही निश्चित केली होती़ भाजपाने मात्र, अचानक वाकचौरे यांना एबी फॉर्म देऊन धोका दिला़ राष्ट्रवादीतील भ्रष्ट नेत्यांना भाजपाने पक्षात प्रवेश दिला़ नेवासा येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, श्रीरामपूरमध्ये बाळासाहेब जाधव व राहुरीत पालवे हेच उमेदवार असतील.राज्यात भाजपाशी युती असली तरी जिल्ह्यात मात्र, युती राहणार नसल्याचे पालवे म्हणाले. श्रीरामपूर जागेच्या वादावरून पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबत सोमवारी बैठक असून, त्यात भाजपाविरोधी भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले़