पराभवाची जबाबदारी घ्या - भाजपातल्या तरूण तुर्कांवर म्हाता-या अर्कांचा हल्ला
By admin | Published: November 10, 2015 08:30 PM2015-11-10T20:30:20+5:302015-11-10T20:33:24+5:30
बिहारमधल्या दारूण पराभवासाठी या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असे सांगत आडवाणी, जोशी आदी ज्येष्ठांनी मोदी-शाह आदींवर निशाणा साधला
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - बिहारमधल्या दारूण पराभवासाठी या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा असे सांगत आडवाणी, जोशी आदी ज्येष्ठांनी मोदी-शाह आदींवर निशाणा साधला आहे. भाजपा दिल्लीतल्या पराभवानंतर काहीच शिकली नसल्याचे खापरही भाजपातल्या बाजुला टाकल्या गेलेल्या ज्येष्ठांनी नव्या नेत्यांवर फोडले आहे.
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारमधल्या पराभवासाठी कुणालाच जबाबदार न धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तसेच तटस्थ समिती नेमून पराभवासाठी कोण जबाबदार आहे याचा शोध घ्यायला पाहिजे असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पराभवासाठी ठराविक असं कोणी जबाबदार नसून ती सगळ्यांचीच जबाबजारी असल्याची भूमिका स्वीकारण्यासारखी नाही अशा कानपिचक्याही या पत्रात देण्यात आल्या आहेत. केवळ एकपानी हे पत्र असले तरी त्यामध्ये सध्या ज्यांच्या हातात पक्षाती सगळी सूत्रे एकवटली आहेत, त्या अमित शाह व नरेंद्र मोदींना योग्य तो संदेश जाईल याची व्यवस्थित काळजी यामध्ये घेण्यात आली आहे.
या चारही नेत्यांना गेल्या वर्षभरात भारतीय जनता पार्टीच्या कामकाजापासून लांब ठेवले गेले आहे. मार्गदर्शक मंडळामध्ये समावेश असलेल्या या ज्येष्ठांनी आज एकत्र येत बिहारच्या पराभवाची मीमांसा केली आणि काही मूठभर नेत्यांनी निवडणुकीची धुरा वाहिली आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे अशी मागणी केली.
या धुरीणांनी कुणाचे नाव नमूद केले नसले तरी त्यांचा रोख मोदी व शाह यांच्यावर असल्याचे जाणवत आहे. भाजपामध्ये बिहार निवडणुकांवरून विद्यमान व माजी अशी फूट पडल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.