पठाणकोटमध्ये अतिरेक्यांचे ठाण

By admin | Published: January 4, 2016 03:30 AM2016-01-04T03:30:18+5:302016-01-04T03:30:18+5:30

पंजाबमधील पठाणकोटच्या हवाईदलाच्या तळावर (एअरबेस) हल्ला करणारे सगळे दहशतवादी मारले गेलेले नाहीत, किंबहुना दोन किंवा त्यापेक्षा जास्त अतिरेकी परिसरातच दडले

Thananakin Thana in Pathankot | पठाणकोटमध्ये अतिरेक्यांचे ठाण

पठाणकोटमध्ये अतिरेक्यांचे ठाण

Next

पठाणकोट : पंजाबमधील पठाणकोटच्या हवाईदलाच्या तळावर (एअरबेस) हल्ला करणारे सगळे दहशतवादी मारले गेलेले नाहीत, किंबहुना दोन किंवा त्यापेक्षा जास्त अतिरेकी परिसरातच दडले असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. दडलेल्या अतिरेक्यांकडून अजूनही अधूनमधून हल्ले सुरू असून रात्री उशिरापर्यंत कमांडोंची शोधमोहीम जारी होती. शनिवारी सुरक्षा दलाने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते.
रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेदरम्यान ग्रेनेड निकामी करताना स्फोट होऊन एनएसजीच्या एका कमांडोचा मृत्यू झाल्यामुळे शहीद जवानांची संख्या ७ वर गेली असून, २० जवान जखमी झाले आहेत. हल्ल्याला ४० तास उलटून गेल्यानंतरही हल्लेखोरांपैकी काही जण सापडले नसल्याने सुरक्षा आणि कारवाई या दोन्ही बाबतीत काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्वत: पंतप्रधानांनी रविवारी दिल्लीत दाखल होताच सर्व संबंधितांसमवेत यावर गहन चर्चा केली.
केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आणि वायुदलाच्या एअर आॅपरेशनचे महासंचालक एअर मार्शल अनिल खोसला यांनी रविवारी संयुक्त पत्रपरिषदेत मोहिमेची माहिती दिली. एअरबेसच्या परिसरात घुसलेल्या सर्व अतिरेक्यांना ठार मारल्यानंतरच शोधमोहीम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. अंधारामुळे शनिवारी रात्री मोहीम थांबविण्यात आली. सकाळी पुन्हा मोहीम सुरू होताच आणखी दोन अतिरेकी दडून असल्याची माहिती मिळाली. लागूनच असलेल्या घनदाट जंगलामुळे अतिरेक्यांच्या नेमक्या संख्येबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. माहिती मिळताच त्वरित मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे एअरबेसच्या तांत्रिक क्षेत्राचे नुकसान झालेले नाही. विमाने उद्ध्वस्त करण्याचे अतिरेक्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत. आॅगस्टमध्ये भारतात ४० अतिरेकी घुसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सतर्कता बाळगली जात होती. तूर्तास ४ अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले आहेत.
अधूनमधून चकमकी झडत राहिल्या...
पठाणकोटच्या एअरबेसवर अधूनमधून अल्प काळ चकमकी झडत असताना सुमारे ५०० जवानांचा समावेश असलेल्या पाच कंपनीची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. घटनास्थळी ठार झालेल्या एका अतिरेक्याच्या मृतदेहातून जिवंत ग्रेनेड काढण्याचा प्रयत्न करताना एनएसजीच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकातील लेप्ट. कर्नल निरंजन यांचा मृत्यू ओढवला. या स्फोटात अन्य चार जवान जखमी झाले. शनिवारी चकमकीत शहीद झालेल्यांमध्ये गरुड कमांडो आणि संरक्षणदलाच्या सुरक्षा कॉर्प्सच्या (डीएससी) तीन सदस्यांचा समावेश आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असता या तिन्ही जवानांनी उपचाराला साथ दिली नाही. अद्यापही डीएससीजी आणि गरुड कमांडो दलाचे ८ जवान मृत्यूशी झुंज देत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेपासून ३५ कि.मी. अंतरावरील पठाणकोटच्या एअरबेसला अतिरेक्यांनी लक्ष्य बनविले.
पर्रीकरांनी मोदींना दिली माहिती
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ताज्या घडामोडींची माहिती दिली. कर्नाटकमधील टुमाकुरू येथे एचएएलच्या कार्यक्रमाला मोदीही उपस्थित होते. जवानांची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) या हल्ल्याबाबत तपास सुरू केला आहे.
विविध सुरक्षा संस्थांचा सहभाग
केवळ हवाईदलाचा तळच नव्हे, तर लगतच्या परिसराची पूर्ण छाननी केल्यानंतरच शोधमोहीम पूर्ण केली जाईल. सध्या या मोहिमेत लष्कर, वायुदल, विविध केंद्रीय दले तसेच पंजाब पोलिसांचा समावेश आहे. शोधमोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. मोहिमेत सहभागी जवानांच्या मदतीसाठी वायुदलाची हेलिकॉप्टर्स या परिसरात घिरट्या घालत आहेत.
नझीरकडे नेतृत्व
पाकिस्तानातील बहवालपूर येथील नझीर याच्याकडे अतिरेकी गटाचे नेतृत्व असल्याची माहिती सुरक्षा संस्थांनी संभाषण खंडित करून मिळविली आहे. जंगल भागातून आलेल्या अतिरेक्यांच्या गटाने एअरबेसजवळील २ हजार एकराच्या परिसरात घुसखोरी करताना जलद प्रतिसाद दलातील गरुड कमांडोंशी दोन हात केले. त्यांनी शनिवारी ४०० मीटर परिसरापर्यंत धडक दिली होती. हवाईदलाची विमाने ठेवलेले भाग अद्यापही ७०० मीटर दूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ड्रग्जमाफियांचा मार्ग...
ड्रग्जमाफिया मादकद्रव्यांच्या तस्करीसाठी उपयोगात आणत असलेल्या मार्गांचा अवलंब करीत अतिरेकी भारताच्या हद्दीत घुसले. पठाणकोटजवळील बामीयाल या गावाला लागून असलेल्या बियास नदीच्या पात्रातून घुसखोरी केली जाते. याच गावातून बियासची उपनदी पाकिस्तानात प्रवेश करते. त्यामुळे तस्करांना हा मार्ग सोयीचा वाटतो. ३०-३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हे अतिरेकी भारतीय हद्दीत घुसले असावेत. पाकिस्तानातील शकरगडमधून बामीयाल या गावी येताना त्यांनी एका खासगी टॅक्सीचा वापर केला होता. टॅक्सीचालक आपल्या वाहनाचे चाक बदलत असताना अतिरेक्यांनी त्याची कार ताब्यात घेतली. त्याला ठार मारल्यानंतर प्रवास पूर्ण होताच कारही उडवून लावली. गुरुदासपूर येथे जात असलेले पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग हे कोलीयन गावाजवळ त्यांच्या तावडीत सापडले. अतिरेक्यांनी सिंग यांच्यासह त्यांचे वाहन पळवून नेले. सिंग यांचे सराफा मित्र राजेश वर्मा आणि वाहनचालकाचा गळा घोटला; नंतर सिंग यांना मुक्त केले. त्यांचे वाहन ताजपूर गावाजवळ बेवारस आढळून आले. हे अंतर एअरबेसपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर आहे.
विशेष स्वात दल द्या - बादल
पंजाबमध्ये सहा महिन्यांमध्ये दोन दहशतवादी हल्ले झाल्याचे पाहता संरक्षणाच्या दुसऱ्या फळीच्या रूपाने एक कमांडो बटालियन आणि विशेष स्वात दल तैनात करण्याची मागणी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी केंद्राकडे केली आहे. राज्य पोलिसांकडे संरक्षणाच्या दुसऱ्या फळीसाठी ‘मास्टर प्लान’ तयार केला जाईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
मोदींनी घेतला सुरक्षेचा आढावा
पठाणकोट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतला. कर्नाटकचा दोन दिवसांचा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, विदेश सचिव एस. जयशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जैशचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसले?
पठाणकोटमधील
हवाई दलाच्या तळावर भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू असतानाच जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याचा संशय गुप्तचर यंत्रणेने
व्यक्त केला आहे.
राजधानीत
मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट लक्षात घेता पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.
हाय अलर्टनंतर
दिल्ली-लखनौ शताब्दी एक्स्प्रेस तपासणीसाठी गाझियाबादला
रोखण्यात आली; याशिवाय दिल्ली व कानपूरदरम्यान बॉम्बचा धोका लक्षात घेता इतरही काही रेल्वेगाड्यांची वाहतूक तपासणीमुळे विस्कळीत झाली.
सुरक्षा तज्ज्ञांचे प्रश्नचिन्ह : पठाणकोट हल्ल्याशी निपटण्याच्या पद्धतीवर सुरक्षा तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पठाणकोट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अतिजोखमीच्या’ लाहोर दौऱ्याचा परिपाक असल्याचे परखड मतही काही तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला
अफगाणिस्तानात मजार- ए- शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ रविवारी रात्री उशिरा हल्ला झाला. यातील दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. आणखी २ अतिरेकी येथे असल्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान स्पेशल फोर्सने या भागाचा ताबा घेतला आहे. दूतावासातील सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.

Web Title: Thananakin Thana in Pathankot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.