दारू पिऊन बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवरदेवांना दोन वधूंनी दिला नकार!

By admin | Published: May 3, 2017 03:09 AM2017-05-03T03:09:59+5:302017-05-03T03:09:59+5:30

आयुष्यभराचा जोडीदार म्हणून आपण ज्याला वरमाला घालणार आहोत तो केवळ व्यसनीच नाही तर लग्नालाही तो नशापाणी

Two brides did not give nawardas standing on beer after drinking alcohol | दारू पिऊन बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवरदेवांना दोन वधूंनी दिला नकार!

दारू पिऊन बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवरदेवांना दोन वधूंनी दिला नकार!

Next

चंदिगढ/ पाटणा : आयुष्यभराचा जोडीदार म्हणून आपण ज्याला वरमाला घालणार आहोत तो केवळ व्यसनीच नाही तर लग्नालाही तो नशापाणी करूनच उभा राहिला आहे हे लक्षात आल्यावर दोन वधूंनी बोहल्यावरून उतरून असे व्यसनी नवरदेव नाकारण्याच्या दोन स्फूर्तिदायक घटना पंजाब व बिहारच्या ग्रामीण भागांत घडल्या आहेत.
यातील पहिली घटना पंजाबमध्ये गुरदासपूरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या दिनानगर येथे रविवारी घडली. दिनानगरमधील २२ वर्षांच्या सुनीता सिंग हिचा विवाह त्या दिवशी गावातील गुरद्वारा महाराजा रणजीतसिंगमध्ये व्हायचा होता. मुकेरियाजवळील खानपूर येथील जसप्रीत हा तिचा नियोजित वर होता. सुनिताचे वडील कमाल सिंग व तिचा होणारा पती हे दोघेही ट्रक ड्रायव्हर आहेत. ट्रकच्या दूरवरच्या सफरीत दोघांची ओळख झाली व ही सोयरीक जुळली होती.
नवरदेवाची वरात गुरुद्वारापाशी आली आणि नशेत धूत असलेला जसप्रीत मोटारीतून उतरून सरळ उभाही राहू शकत नाही, असे चित्र
दिसले. नशेमुळे नाही तर ट्रक अपघातात पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो लडखडतो आहे, असे सांगून मुलाकडच्या मंडळींनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.  पण नशापाणी करणाऱ्याची लग्न न करण्याचे सुनिताने जाहीर केले. तिने आग्रह केल्यावर जसप्रीतची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यात त्याने अमली पदार्थांची नशा केल्याचे निष्पन्न झाले.
प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. सुनिताची जिद्द पाहून पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत घातली. जसप्रीत व सुनिताने साखरपुड्यात परस्परांना घातलेल्या अंगठ्या परत केल्या आणि नवरदेवाची वरात वधूशिवाय परत गेली. (वृत्तसंस्था)

घटनांचे दूरगामी संदेश

या दोन्ही घटना केवळ विरळा म्हणून नव्हे तर त्यातून मिळणाऱ्या सामाजिक संदेशासाठीही लक्षणीय आहेत. पंजाबच्या तरुणाईत अमली पदार्थांचे व्यसन ही किती गंभीर समस्या आहे, याचे तेथील घटना हे द्योतक आहे.
नितिश कुमार यांनी बिहारमध्ये गेले वर्षभर संपूर्ण दारुबंदी केली आहे. दारू पिणे, जवळ बाळगणे किंवा विकणे यासाठी १० वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे. ही दारुबंदी किती आवश्यक आहे किंवा ती किती फोल आहे या दोन्ही दृष्टीने बक्सरची घटना बोलकी आहे.

गेल्याच आठवड्यात ऐन लग्नमंडपातून बोहल्यावरच्या वधू लग्न न करताच खाली उतरल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. अर्थात त्यांची कारणे वेगळी होती. एकीने नवरदेवाने हुंडा म्हणून मोटारसायकल मागितल्याने नकार दिला होता तर दुसरीने काळा नवरदेव आपल्याला अनुरूप नाही, असे सांगून नकार दिला होता.

राणी कुमारीनेही तेच केले

दुसरी घटना बिहारमध्ये बक्सर जिल्ह्यात सुजातपूर गावात घडली. तेथील राणी कुमारीचे लग्न गेल्या शुक्रवारी रोहतास जिल्ह्यातील २४ वर्षांच्या बिट्टू पांडेशी होणार होते. ७० किमीचा प्रवास करून नवरदेवाची वरात मंडपात आली. लन्गविधी सुरु झाले. पुरोहित सांगत असलेल्या विवाहाच्या आणाभाका घेतानाही बिट्टूची जीभ लडखडत होती. वधूच्या भांगात सिंदूर भरण्याचा सर्वात महत्वाचा लग्नविधी सुरु झाला आणि बिट्टू दारु पिऊन तर्र आहे हे उघड झाले कारण थरथरत्या हाताने त्याला राणीच्या भांगात सिंदूर काही भरता येईना. इतका वेळ बोहल्यावर बसून बिट्टूची ही थेरं पाहणाऱ्या राणीचा संयम सुटला आणि अशा व्यसनी माणसाशी मी लग्न करणार नाही, असे जाहीर करून ती लग्नमंडपातून तडख बाहेर पडली!
दोन्ही बाजूंच्या वडिलधाऱ्यांनी राणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि बिट्टूच्या वऱ्हाडालाही नववधू सोबत न घेताच घरी परतावे लागले.

Web Title: Two brides did not give nawardas standing on beer after drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.