पुण्याचे अस्वस्थ राजकारण
By admin | Published: September 26, 2014 05:39 AM2014-09-26T05:39:35+5:302014-09-26T05:39:35+5:30
गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजप मध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे
पुणे : गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजप मध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेने पेक्षा 10 नगरसेवक जास्त असले, तरी भाजपमध्ये असलेले गटतटाचे राजकरण आणि भाजपच्या तुलनेत शिवसेनेची शहरात असलेली संघटानात्मक बांधणी यामुळे शहरातील आपले तीन बालेकिल्ले वाचविण्याचे आव्हान शहर भाजप पुढे असल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावर निर्माण झाले आहे.
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांना तब्बल 2 लाख 96 हजार मताधिक्य मिळाले. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार असलेल्या कोथरूड मतदारसंघातून शिरोळे यांना तब्बल 1 लाख 22 हजार मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा अधोरेखीत झाली होती. तसेच मागील विधानसभा निवडणूकीतही नव्याने निर्माण झालेल्या पर्वती मतदारसंघातही शिवसेनेच्या मदतीने भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी झाल्या होत्या.2011 मध्ये झालेल्या खडकवासला मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या मदतीने भाजपचे उमेदवार भिमराव तापकीर मोठया मताधिक्क्याने विजयी झाले होते. मात्र, निवडणूका अवघ्या तीन आठवडयांवर येऊन ठेपल्या असताना आता भाजपला सर्व मतदारसंघाची पुनर्बाधनी करावी लागणार आहे. मात्र, युती होणार नाही हे गृहीत धरून सर्व मतदारसंघातून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपने या पूर्वीच केली होती. त्यात विद्यमान तीन आमदारांबरोबरच शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात युती असल्याने भाजपकडून विधानसभेनंतर पक्षबांधणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरूनच भाजपने सेनेच्या ताब्यात असलेल्या कोथरूड, कँन्टोन्मेंट, वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघातून उमेदवारांना तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार, अनेक इच्छूकांनी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध घ्यावी लागणार नसली तरी, लोकसभेत चाललेला मोदी फँक्टर विधानसभेत न चालल्यास सेनेच्या उमेदवारा बरोबरच भाजपच्या उमेदवारांची सरळ सरळ लढत होनार आहे. त्यात शिवसेना वरचढ होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये ही अस्वस्थता आहे.(प्रतिनिधी)