विजय मल्ल्या कायद्याला तुच्छ लेखतात, न्यायालयाने सुनावलं

By admin | Published: November 4, 2016 02:31 PM2016-11-04T14:31:28+5:302016-11-04T14:31:28+5:30

बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे

Vijay Mallya denies the law, and the court heard | विजय मल्ल्या कायद्याला तुच्छ लेखतात, न्यायालयाने सुनावलं

विजय मल्ल्या कायद्याला तुच्छ लेखतात, न्यायालयाने सुनावलं

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. विजय मल्ल्या यांना वारंवार समन्स पाठवूनही दुर्लक्ष केल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 'विजय मल्ल्या कायद्याला तुच्छ लेखत असून अजिबात आदर करत नाहीत, भारतात परतण्याचा त्यांचा कोणताच उद्देश नसल्याचा', निष्कर्ष न्यायालयाने यावेळी दर्शवला आहे.
 
(मल्ल्यांना भारतात परतण्यासाठी पासपोर्टची गरज नाही - परराष्ट्र मंत्रालय)
 
'आपली भारतात परतण्याची इच्छा आहे, पण पासपोर्ट रद्द करण्यात आल्याने परत येऊ शकत नाही हा दावा अत्यंत अप्रामाणिक आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेणारा असल्याचं', न्यायालयाने म्हटलं आहे. 2012 मध्येही चेक बाऊन्स प्रकरणी विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. 
 
(विजय मल्ल्याच्या व्हिलाचा १९ ऑक्टोबरला होणार लिलाव)
(मल्ल्याची ६६३० कोटींची आणखी मालमत्ता जप्त!)
 
विजय मल्ल्या भारतात यायला तयार आहेत, मात्र भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केला आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत भारतात परतणे शक्य नाही असा दावा विजय मल्ल्याच्या वकिलाने पटियाला कोर्टात केला होता. मल्ल्याच्या वकिलाने कोर्टात हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाकडे उत्तर मागितले होते. त्याच प्रकरणाची सुनावणी आज पार पडली.   
 
(मल्ल्यांच्या ६,००० कोटींच्या संपत्तीवर टाच)
 
पटियाला हाउस कोर्टाने विजय माल्ल्याविरोधात दोन वेळेस समन्स जारी केला असून स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले होते.
विजय मल्ल्या यांनी पासपोर्ट रद्द करण्यात आलेला असल्याने भारतात परतणं शक्य नसल्याचा केलेला दावा परराष्ट्र मंत्रालयाने खोडला आहे. विजय मल्ल्यांना खरंच भारतामध्ये परतायचं असेल तर आणीबाणी प्रमाणपत्राची (इमर्जन्सी सर्टिफिकेट) सोय उपलब्ध आहे. कोणत्याही नागरिकाला भारतामध्ये परतायचं असेल तर जवळच्या भारतीय दुतावासाशी किंवा उच्चायुक्तांशी संपर्क साधून आणीबाणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करु शकतात अशी माहिती अधिका-यांनी दिली होती. 
 
(विजय मल्ल्याविरोधात सीबीआयकडून अजून एक गुन्हा नोंद)
 
'आणीबाणी प्रमाणपत्र हे एक विशेष प्रवास दस्तऐवज असून भारतीय नागरिकाला देशामध्ये परतण्याची मुभा यातून मिळते,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली होती. विजय मल्ल्या या सुविधेचा फायदा घेत अर्ज करणार का ? असा सवालही त्यांनी विचारला होता. 
 
मल्ल्यांचं पलायन - 
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
 

Web Title: Vijay Mallya denies the law, and the court heard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.