"मी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल"; बंगालमध्ये वक्फ कायदा लागू करणार नसल्याची ममतांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:34 IST2025-04-09T14:22:24+5:302025-04-09T14:34:19+5:30
मला गोळ्या घातल्या तरी सर्व धर्मांच्या उत्सवात सहभागी होईल -ममता बॅनर्जी

"मी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल"; बंगालमध्ये वक्फ कायदा लागू करणार नसल्याची ममतांची घोषणा
Waqf Amendment Bill Murshidabad Violence:वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरुन पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही त्याला विरोध सुरुच आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. वक्फ सुधारणा विधेयकावरून मुर्शीदाबादमध्ये हिंसाचार उफाळला. मुर्शिदाबादमधील अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम समुदायाच्या मालमत्तेचे रक्षण करण्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच मला गोळ्या घातल्या तरी सर्व धर्मांच्या उत्सवात सहभागी होईल असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. मुर्शिदाबादमध्ये दंगेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. काही ठिकाणी पोलिसांशीही झटापट झाली. आंदोलकांनी यावेळी पोलिसांच्या गाड्या देखील पेटवल्या. त्यामुळे मुर्शिदाबादमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विश्व नवकार महामंत्र दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी एकतेचे आवाहन केले. मी बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
"काही लोक मला विचारतात की मी सर्व धर्मांच्या कार्यक्रमांना का भेट देता. मी म्हणालो की मी माझ्या संपूर्ण आयुष्यभरात भेट देत राहीन. तुम्ही मला गोळ्या घालून ठार मारले तरी तुम्ही मला यापासून वेगळे करू शकणार नाही. बंगालमध्ये फूट पडणार नाही, जगा आणि जगू द्या," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
"जर माझी मालमत्ता घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, तर दुसऱ्याची मालमत्ता घेतली जाईल असे मी कसे म्हणू शकतो? आपल्याला ३० टक्के असलेल्या सोबत घेऊन चालावे लागेल. लक्षात ठेवा दीदी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
"मला माहिती आहे की तुम्ही वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीवर नाराज आहात. पण विश्वास ठेवा... बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही ज्यामुळे कोणीही विभाजन करून राज्य करू शकेल. बांगलादेशातील परिस्थिती पहा. वक्फ दुरुस्ती विधेयक आता मंजूर व्हायला नको होते," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.