अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड-यवतमाळ रेल्वेमार्गास विलंब
By admin | Published: December 6, 2014 12:14 AM2014-12-06T00:14:48+5:302014-12-06T00:14:48+5:30
अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.
नवी दिल्ली : अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. ते म्हणाले, २८४ किलोमीटरच्या या मार्गावरील ३४ किलोमीटर भूमी अधिग्रहीत केली असून, सध्या वर्धा- यवतमाळ पट्ट्यातील पुलांची कामे सुरू झाली आहेत.
खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत शुक्रवारी, वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाच्या प्रगतीसोबतच मार्ग केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न विचारला होता. रेल्वे राज्यमंत्री सिन्हा उत्तरात म्हणाले, की या मार्गाची अधिकृत घोषणा २००८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात केली होती. वर्धा- नांदेड- यवतमाळ -पुसद या नव्या मार्गाचे काम रेल्वे राज्य सरकारच्या ६०-४० टक्के भागीदारीत २००८-२००९ मध्ये सुरू झाले. ६९७ कोटी रूपयांच्या आराखड्याला मान्यता दिली होती. प्रत्यक्षात मात्र, मार्च २०१४ पर्यंत ६७ कोटी रूपये खर्च करण्यात आले.
२०१४-१५ यावर्षात १५ कोटींची तरतूद करण्यात आली. निधीच्या कमतरतेसोबतच जागा उपलब्ध नसल्याने वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असून, या योजनेचा सध्याचा अपेक्षित खर्च २५०० कोटी आहे.
जागेच्या दरात मोठी वाढ झाल्याने भूमीसंपादनाचा मोठा खर्च येत आहे, असे सांगून सिन्हा यांनी स्पष्ट केले, कमतरतेअभावी सर्व योजनांना नियमित आधारावर पुरेसा निधी देणे शक्य होणार नाही. त्यामुळÞे या योजनेच्याही कालबध्दतेसाठी सध्याच अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. (विशेष प्रतिनिधी)
अपेक्षित खर्चात वाढ : दर्डा यांच्या प्रश्नावर रेल्वे राज्यमंत्र्यांचे उत्तर