'कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत'; पंतप्रधानांनी दिला 'मोदी गॅरंटी'वर जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:28 IST2025-02-03T09:27:03+5:302025-02-03T09:28:14+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

'कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत'; पंतप्रधानांनी दिला 'मोदी गॅरंटी'वर जोर
नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकार गरीब, शेतकरी, युवक व महिला या चार स्तंभांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकाराचा अर्थसंकल्प हा मोदींची गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी असल्याचा दावा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. बजेटमधील विविध तरतुदींचा उल्लेख करत भारताच्या स्वतंत्र्यानंतर कधीच १२ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना करातून दिलासा मिळाला नसल्याचा दावा करतानाच दिल्लीतील सत्ताधारी आपला मोदींनी लक्ष्य केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
दिल्लीतील सत्ताधारी आपच्या खोट्या आश्वासनामुळे व धोरणामुळे कारखाने बंद होत आहेत. ज्या लोकांनी जनतेची लूट केली त्यांना हिशेब द्यावा लागेल. खोट्या आश्वासनासोबत आपत्ती उभी आहे, तर दुसऱ्या बाजूंना मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे लोकांनी भाजपला निवडून देण्याचा निश्चिय केला आहे. आपत्तीने राष्ट्रीय राजधानीचे ११ वर्षे वाया घालवल्याचा दावा मोदींनी केला.
मोदी म्हणाले, 'कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत'
दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास सर्व योजना बंद केल्या जातील हा आपचा आरोप फेटाळून लावताना दिल्लीतील एकाही झोपडीला सरकार हात लावणार नसल्याचा दावा मोदींनी केला. दिल्लीतील नागरिकांसाठी सुरू असलेली कोणतीही कल्याणकारी योजना बंद केली जाणार नाही.
८ फेब्रुवारीला दिल्लीत भाजप सरकार स्थापन करणार असून ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना २५०० हजार रुपये मिळायला सुरुवात होईल. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येण्यासाठी महिलांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे मोदींनी नमूद केले.