५०० वर्षांपूर्वी बाबरनं जे केलं, तेच आज संभलमध्ये घडतंय... योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्लाबोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:33 IST2024-12-05T15:12:35+5:302024-12-05T15:33:08+5:30
CM Yogi Adityanath in Ayodhya : लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

५०० वर्षांपूर्वी बाबरनं जे केलं, तेच आज संभलमध्ये घडतंय... योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्लाबोल!
CM Yogi Adityanath in Ayodhya : अयोध्या : अयोध्येत ४३ व्या रामायण मेळाव्याचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यना यांनी विरोधकांवर तसेच राज्याचे वातावरण बिघडवत असलेल्या घटकांवर जोरदार हल्लाबोल केला. जे काम बाबरच्या एका सेनापतीने ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत केले होते, तेच काम आज संभल आणि शेजारील बांगलादेशात केले जात आहे. त्या सर्वांचा डीएनए एकच आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
आजही समाजाच्या जडणघडणीला तडा देणारे लोक येथे उभे आहेत. सामाजिक एकात्मता भंग करून आम्हा लोकांमध्ये फूट पाडण्याची पूर्ण व्यवस्थाही करत आहोत. लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
संभल आणि बांगलादेशमध्ये जे काही घडत आहे, त्या सर्वांचा डीएनए एकच आहे, असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभल हिंसाचार प्रकरणावरून संताप व्यक्त केला. तसेच, भगवान श्रीरामांनी समाज आणि भारत यांना जोडण्याचे काम केले. अयोध्या हे भगवान रामप्रती भारताच्या भक्तीचे प्रतीक आहे. प्रभू राम आणि जानकी यांच्याबद्दल ज्यांच्या मनात श्रद्धा नाही, त्यांचा कट्टर शत्रूप्रमाणे त्याग केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
डॉ. राम मनोहर लोहिया यांचा उल्लेख
रामायण मेळा १९८२ मध्ये सुरू झाला. त्याआधी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी देशाच्या विविध भागात रामायण मेळावे सुरू केले होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्म याच अयोध्येत आणि आजच्या आंबेडकर नगरीत झाला. ते खूप शिकलेले होते, मात्र मंदिरात जात नव्हते. समाजवादी विचारवंत होते. त्यांनी म्हटले होते की, राम, कृष्ण आणि महादेव या तीन देवांवर जोपर्यंत भारताची श्रद्धा आहे, तोपर्यंत देशाचे कोणीही काहीही करू शकत नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.