कोण आहेत शंकरसिंह वाघेला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:32 PM2017-07-21T13:32:46+5:302017-07-21T15:05:30+5:30

गुजरातच्या राजकारणात बापू नावाने ओळखले जाणारे शंकरसिंह वाघेला आज ७७ व्या वाढदिवशीच कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.

Who are Shankarsinh Vaghela? | कोण आहेत शंकरसिंह वाघेला?

कोण आहेत शंकरसिंह वाघेला?

googlenewsNext
आॅनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि.२१- गुजरात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातच्या राजकारणात बापू नावाने ओळखले जाणारे शंकरसिंह वाघेला आज ७७ व्या वाढदिवशीच कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. गेले अनेक दिवस गुजरात कॉंग्रेसमध्ये सुरु असणारी धुसफूस आता सर्वोच्च बिंदूवर पोहोचली असून त्यामुळेच विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना वाघेलांसारखा नेता पक्ष सोडून जाईल असे सांगण्यात येत आहे.

शंकरसिंह वाघेला आज एक महत्त्वाची घोषणा करतील असे भाकीत करण्यात आले असून त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला तर ते पुन्हा भाजपामध्ये जाणार की स्वतंत्र पक्ष स्थापन करणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. शंकरसिंह वाघेला हे पुर्वी जनसंघाचे त्यानंतर जनता पार्टीचे आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात. १९९६ साली त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना एका वर्षासाठी गुजरातचे मुख्यमंत्रीपदही भूषवता आले. १९९७ साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन केला. वाघेला हे पाचवेळा लोकसभेत निवडून गेले असून १९८४ ते १९८९ या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. संपुआ१ सरकारमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये ते वस्त्रोद्योग मंत्री होते. सध्या ते गुजरातच्या कापडवंज मतदारसंघातून गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत.

1995  साली वाघेला यांनी ४७ आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड केले होते. हे बंड शांत करण्यासाठी केशुभाई पटेल यांच्याऐवजी सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यात आले. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोध्रा मतदारसंघातून लढताना वाघेला यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्याच वर्षी आॅक्टोबर महिन्यात कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. मात्र १९९७ त्यांना पदावरुन बाजूला व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या जागी दिलिप पारिख हे मुख्यमंत्री झाले. पण पारिख यांचेही सरकार फार काळ चालू शकले राहिले. अखेर १९९८ साली विधानसभेची निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेमध्ये आला आणि केशुभाई पुन्हा मुख्यमंत्री झाले.
 
भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर त्यांनी गुजरात कॉंग्रेसच्या उच्च वर्तुळात स्थान मिळवले. शक्तीसिंह गोहिल यांच्यानंतर २०१३ साली वाघेला यांच्याकडे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची  जबाबदारी आली. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मतदानामध्ये गुजरात कॉंग्रेसची ११ मते फुटली असून या आमदारांनी आपले मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पारड्यात टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. ही ११ मते वाघेला समर्थकांची असल्याची चर्चा गुजरातच्या राजकीय वर्तुळात होत आहे.
 
 
 
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करावे अशी वाघेला यांची मागणी होती. पण काँग्रेस नेतृत्वाने त्यांची मागणी फेटाळून लावल्याने ते नाराज आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर झालेली शेवटची बैठक निष्फळ ठरली होती. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करणे शक्य नसल्याचे वाघेला यांना स्पष्ट केले. काँग्रेसच्या नेत्यांना ते पटणार नाही असे त्यांना सांगण्यात आले

 

Web Title: Who are Shankarsinh Vaghela?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.