Yaas Cyclone: एक कोटी लोकांना वादळाचा तडाखा, १५ लाख लोक झाले बेघर, प. बंगाल, ओडिशामध्ये सर्वाधिक नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 07:03 IST2021-05-27T06:54:44+5:302021-05-27T07:03:54+5:30
Yaas Cyclone: प. बंगाल व ओडिशामध्ये मिळून १५ लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

Yaas Cyclone: एक कोटी लोकांना वादळाचा तडाखा, १५ लाख लोक झाले बेघर, प. बंगाल, ओडिशामध्ये सर्वाधिक नुकसान
कोलकाता/बालासोर : यास चक्रीवादळाचा सर्वात मोठा तडाखा पश्चिम बंगालला बसला असून, तेथील तीन लाख घरांचे नुकसान झाले आहे. प. बंगाल व ओडिशामध्ये मिळून १५ लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
या चक्रीवादळामुळे असंख्य झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले व हजारो गावातील वीज गेली आहे. ओडिशानंतर यास उद्या, गुरुवारी झारखंडमध्ये पोहोचण्याची शक्यता असून, तिथे अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र लाखो नागरिकांचे वादळाआधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
- मोठे नुकसान झालेल्या दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर, उत्तर २४ परगणा या जिल्ह्यांची ममता बॅनर्जी शुक्रवारी हवाई पाहणी करणार आहेत.
- चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील हवाई वाहतूक बुधवारी थांबविण्यात आली होती.
- यास चक्रीवादळामुळे भारतीय नौदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ आदींनी बचावकार्य हाती घेतले आहे.
उलटलेल्या बोटीतील १० जणांना वाचविले
यास चक्रीवादळामुळे ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यामध्ये एका नदीत मंगळवारी रात्री बोट उलटली. त्या बोटीतील सर्व दहा प्रवाशांना वाचविण्यात यश आले.
गावांमध्ये शिरले पाणी
ओडिशामध्ये बुधवारी दोन जणांचा मृत्यू झाला. राज्यातील बालासोर जिल्ह्यातल्या अनेक गावात समुद्राचे पाणी शिरले होते.
अनेक विमाने रद्द
मुंबई विमानतळावरून भुवनेश्वर आणि कोलकात्याला जाणारी सहा विमाने रद्द करण्यात आली आहेत. भुवनेश्वर विमानतळ २५ ते २७ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, तर झारसुगुडा २६ ते २७ मे पर्यंत बंद ठेवण्यात आले.
यास चक्रीवादळ गुरुवारी झारखंडमध्ये धडकणार असल्याने सिंगभूम येथील पूर्व व पश्चिम भागातील सुमारे सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात ओडिशातील धामरा बंदर ते बालासोरच्या दरम्यानच्या प्रदेशास यास चक्रीवादळाचा बुधवारी सकाळी जोरदार तडाखा बसला.
या परिसरात ताशी १३५ ते १४५ किमी इतक्या वेगाने यास चक्रीवादळ धडकले. त्यात उत्तर ओडिशातील किनारपट्टीवर असलेल्या कित्येक घरांचे तसेच पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
पाच राज्यांत एनडीआरएफच्या ११३ तुकड्या तैनात
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल डिझाॅस्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ओडिशा व पश्चिम बंगालसह पाच राज्ये व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशात ११३ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. यास चक्रीवादळ धडकताच एनडीआरएफ व अन्य दलांनी केलेल्या बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली.