हो! आहेत आम्हाला ९ मुले, पण तुम्हाला काय अडचण आहे? राबडीदेवींचा नितीशकुमारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:30 IST2024-05-31T14:16:38+5:302024-05-31T14:30:37+5:30
"ते एका मुलालाही सांभाळू शकले नाहीत आणि प्रचारात शिवीगाळ करतात"

हो! आहेत आम्हाला ९ मुले, पण तुम्हाला काय अडचण आहे? राबडीदेवींचा नितीशकुमारांवर निशाणा
एस.पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : “नितीशकुमार यांना एकुलता एक मुलगा आहे. तोही ते सांभाळू शकले नाही, आमची मुले तर चांगले करत आहेत. नितीशकुमार निवडणूक प्रचारादरम्यान शिवीगाळ करत आहेत. आम्हाला ९ मुले आहेत, तर त्यांना काय अडचण आहे?” असा प्रतिहल्ला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विधानावर केला. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक पातळीवर टीका झाली.
नितीशकुमार यांनी राबडीदेवींच्या नऊ मुलांबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. राबडीदेवी म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाने राज्य चालवले आहे, हे त्यांना कळायला हवे. गरज पडली तर आम्ही देशही चालवू शकतो.
मार्केटिंगसाठी कन्याकुमारीला’
राजदचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेेंद्र मोदी स्वत:चे मार्केटिंग करण्यासाठी कन्याकुमारी येथे गेले आहेत. ध्यानधारणा करताना अडथळे येतील, अशा कोणत्याही गोष्टी त्यांनी करू नयेत.
लोकसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये दिसणार वेगळेच चित्र
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे भाजपबरोबर नीट जमत नाही. त्यांच्यात अजिबात समन्वय नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये काहीतरी वेगळेच चित्र पाहायला मिळणार असल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला. बिहारचे राज्यपाल हे सध्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असून, त्यात विविध निर्णय घेतले जातात, असे मी ऐकून आहे. भाजप व जनता दल (यू) या यांच्यात समन्वय दिसत नाही असेही ते म्हणाले.