इंग्लंड सर्वबाद ४८६, भारताचे फलंदाज पुन्हा फ्लॉप
By Admin | Published: August 17, 2014 05:35 PM2014-08-17T17:35:25+5:302014-08-17T17:41:46+5:30
इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला असून इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी आहे. मात्र दुस-या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले आहेत.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १७ - पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात इंग्लंडकडे तब्बल ३३८ धावांची आघाडी असून पराभव टाळण्यासाठी भारताची सर्व मदार आता फलंदाजांवर आहे. दुस-या डावातही भारताची सुरुवात निराशाजनकच झाली असून सलामीची जोडी अवघ्या नऊ धावांमध्येच तंबूत परतली आहे.
लंडनमधील ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या १४८ धावांवर गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलदांजांना यश आले होते. या खेळपट्टीवर भारताचे गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचा पहिला डाव ४८६ धावांवर संपुष्टात आला. तिस-या दिवशी सात बाद ३८५ धावांवरुन पुढे खेळताना इंग्लंडच्या तळाच्या सात फलंदाजांनी धावफलकावर तब्बल १०० धावा जोडल्या. जो रुटने दिमाखदार शतक ठोकले. रुटने ख्रिस जॉर्डन (२० धावा) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३७ धावा) यांच्या मदतीने इंग्लंडला ४८६ धावांचा डोंगर उभारुन दिला. रुट १४९ धावांवर नाबाद राहिला. भारतातर्फे इशांत शर्माने ९६ धावांत चार विकेट घेतल्या. तर आर अश्विनने ७२ धावांमध्ये तीन विकेट घेतल्या. तर वरुण अॅरोनने दोन तर भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेतली.
डावाने पराभव टाळण्यासाठी भारताला ३३८ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. मात्र पुन्हा एकदा भारताची फलंदाजांची अपयशाची मालिका सुरुच राहिली. मुरली विजय दोन धावांवर पायचीत तर गौतम गंभीर दोन धावांवर रनआऊट झाला आहे. भारताची अवस्था दोन बाद ९ धावा अशी झाली असून पावसामुळे लवकर लंचब्रेक घेण्यात आला आहे.