आवश्यक भागीदारी करूशकले नाहीत फलंदाज : महेंद्रसिंग धोनी
By Admin | Published: October 22, 2016 12:57 AM2016-10-22T00:57:09+5:302016-10-22T00:57:09+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने न्यूझीलंडविरुद्ध येथे दुसऱ्या वन-डेत झालेल्या निसटत्या पराभवास नियमित अंतराने विकेट पडणे आणि मोठी भागीदारी होऊ न शकणे
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने न्यूझीलंडविरुद्ध येथे दुसऱ्या वन-डेत झालेल्या निसटत्या पराभवास नियमित अंतराने विकेट पडणे आणि मोठी भागीदारी होऊ न शकणे या बाबी कारणीभूत असल्याचे सांगितले.
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी चांगली केली; परंतु फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना या सामन्यात ६ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. धोनीने पराभवाबद्दल निराशा व्यक्त केली.
तो म्हणाला, ‘‘या पराभवासाठी कोणा एका खेळाडूला दोषी ठरवले जाऊ शकत नाही. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करताना सातत्याने विकेट गमावल्या आणि एकही मोठी भागीदारी रचण्यात अपयशी ठरलो.
या लढतीत प्रत्येक खेळाडूने आपल्या कामगिरीत थोडीथोडी सुधारणा केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता.
गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी यशस्वीपणे पेलली, असे मला वाटते; परंतु लवकर लवकर विकेट गमावल्याने आमच्यावर दबाव वाढला. आम्ही अखेरपर्यंत धावसरासरी राखली; परंतु विकेट हातात नसल्याने आम्ही लक्ष्यापासून दूर राहिलो.’’
धोनीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही श्रेय दिले. ‘‘न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी
सुरेख गोलंदाजी करताना
कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला.
खेळपट्टी ही फलंदाजासाठी प्रतिकूल होती असे नव्हते; परंतु पाहुण्या संघातील गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करताना फलंदाजांना फक्त जखडूनच ठेवले नाही, तर विकेटही घेतल्या.
आम्ही मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी मिळवली होती; परंतु आता ती गमावली आहे. आम्ही पुढील लढतीत जोरदार मुसंडी मारण्याच्या इराद्याने खेळू.’’