पराभव वेदनादायी
By admin | Published: August 11, 2014 02:12 AM2014-08-11T02:12:04+5:302014-08-11T02:12:04+5:30
मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर हुरळून जायचे नाही आणि पराभव स्वीकारावा लागला तरी राग व्यक्त करायचा नाही
मँचेस्टर : मोठ्या फरकाने विजय मिळविल्यानंतर हुरळून जायचे नाही आणि पराभव स्वीकारावा लागला तरी राग व्यक्त करायचा नाही, ही कॅप्टन कुल धोनीची विशेषता आहे. मात्र मँचेस्टरमध्ये मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्याला आपली निराशा लपवता आली नाही. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पत्रकार परिषदेत धोनी हसऱ्या चेहऱ्याने आला. मात्र त्याला आपल्या नेहमीच्या शैलीने संघांच्या पराभवाचे समर्थन करता येत नव्हते. तसेच त्याला आपली निराशाही लपवता आली नाही.
पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘हा पराभव आम्हाला जास्तच झोंबला आहे. खेळपट्टी चांगली असताना कसोटी सामन्यांत तीन दिवसांत पराभव स्वीकारावा लागणे निराशाजनक आहे. पहिल्या दिवशीची सुरुवातीचीे ४५ मिनिटे निर्णायक ठरली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे यजमान संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी मिळाली. दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली नाही, असे तुम्हाला म्हणता येईल; पण पहिल्या दिवशी पहिल्या तासाचा खेळच महत्त्वाचा ठरला.’
धावफलकावर धावा असणे महत्त्वाचे असते. लॉर्डस् कसोटीत तळाच्या फलंदाजांचे योगदान उल्लेखनीय ठरले. या मालिकेत तळाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाचव्या गोलंदाजाने अधिक धावा फटकाविल्या आहेत, असेही धोनी म्हणाला.
संघातील काही फलंदाज फॉर्मात नाहीत, हे सत्य असले तरी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करण्यासाठी धावफलकावर पुरेशा धावा असणे आवश्यक आहे. जर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळाली तर प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्याची भारतीय गोलंदाजांमध्ये क्षमता आहे, ही सकारात्मक बाब या कसोटी सामन्यातून सिद्ध झाली.