भारत मॅच हरल्यामुळे बेघरांना मिळाले अन्न...
By Admin | Published: August 13, 2014 11:54 AM2014-08-13T11:54:49+5:302014-08-13T12:22:20+5:30
इंग्लंड वि भारताची चौथी कसोटी लवकर संपल्याने सामन्याच्या उर्वरित दिवसांसाठी मागवण्यात आलेले अन्न बेघर लोकांना वाटण्यात आल्याने त्यांची अन्नाची चिंता मिटली.
>ऑनलाइन टीम
लंडन, दि. १३ - इंग्लंड वि भारताची ओल्ड ट्रॅफोर्ड येथील चौथी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपल्याने चाहत्यांची, तसेच आयोजकांची भलेही निराशा झाली असली तरी याचा फायदा काही बेघर लोकांना झाला आहे. हा सामना लवकर संपल्यामुळे सामन्याच्या चौथ्या व पाचव्या दिवसासाठी मागवण्यात आलेले जेवण येथील बेघर लोकांना देण्यात आले व त्यांची दोन दिवसांसाठी अन्नाची ददात मिटली.
ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानाची मालकी असणा-या लँकेशायर कंट्री क्रिकेट क्लबने आपले कर्मचारी आणि स्वयंसेवकांसाठी सँडविच मागवली होती, मात्र सामना तिस-या दिवशीच संपुष्टात आल्याने चौथ्या व पाचव्या दिवसासाठी मागवण्यात आलेले हे अन्न वाया जाण्याची भीती निर्माण झाली. मात्र क्लबच्या अधिका-यांनी ही सँडविच स्थानिक बेघर नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आणि 'नॅरोगेट इमर्जन्सी अॅकॉमोडेशन' या संस्थेतर्फे ती नागरिकांना वाटण्यात आली. अशाप्रकारे त्यांची दोन दिवसांची अन्नाची चिंता मिटली.
इंग्लंड वि भारतादरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे.