हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:47 IST2024-10-25T18:39:38+5:302024-10-25T18:47:49+5:30
राणी रामपालने गुरुवारी हॉकीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
Rani Rampal Retirement : राणी रामपालने गुरुवारी हॉकीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. भारताच्या हॉकीला नव्या उंचीवर पोहोचवणारी राणी रामपाल. भारताच्या महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने गुरुवारी आपल्या १६ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीला पूर्णविराम देत निवृत्तीची घोषणा केली. तिने वयाच्या २९व्या वर्षी हॉकीला रामराम केले. हरयाणातील एका लहान शहरातून आलेल्या राणीने आपल्या प्रभावी कामगिरीने देशाला आपल्या खेळीची दखल घ्यायला लावली. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाला आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीकडे नेले. राणीला पुढील प्रवासासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. IAS अधिकारी सोनल गोयल यांनीदेखील राणीला शुभेच्छा दिल्या.
गोयल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, राणी रामपाल आता मैदानाच्या पलीकडे एक नवीन अध्याय सुरू करते. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करण्यापर्यंतचा तिचा उल्लेखनीय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. राणीने केवळ देशाचा गौरवच केला नाही तर प्रत्येक मुलीला स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आणि उच्च ध्येय ठेवण्यासाठी प्रेरित केले आहे.
FAREWELL TO OUR QUEEN OF HOCKEY 🏑🇮🇳
— Sonal Goel IAS 🇮🇳 (@sonalgoelias) October 25, 2024
Wishing dear Rani Rampal the very best as she begins a new chapter beyond the field 🏑✨
Her remarkable journey, from humble background to leading the Indian hockey team, reflects the power of dreams and hard work.
Rani has not only… pic.twitter.com/tUrLrdKtFZ
दरम्यान, राणीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले आणि भारतासाठी २५४ सामन्यांमध्ये २०५ गोल केले. तिला २०२० मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्याच वर्षी तिला पद्मश्री हा देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. खरे तर राणी रामपाल २०२३ च्या सुरुवातीपासूनच भारतासाठी खेळली नाही. तत्कालीन प्रशिक्षक जेनेके शॉपमन यांनी तिला वगळण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले होते. मात्र, राणीने तिला वगळण्याचे स्पष्ट कारण न दिल्याने निराशा व्यक्त केली.