भारतच आशियाचा शेर, विजेतेपदाचे ‘विराट-शिखर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2016 03:19 AM2016-03-07T03:19:27+5:302016-03-07T12:12:38+5:30

. हायहोल्टेज स्वरूप प्राप्त झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशवर ८ गडी आणि ७ चेंडू राखून मात केली. या विजयानंतर भारताने आशिया चषक टी-२० चषकावर नाव कोरले.

India is the lion of Asia, the 'Virat-peak' | भारतच आशियाचा शेर, विजेतेपदाचे ‘विराट-शिखर’

भारतच आशियाचा शेर, विजेतेपदाचे ‘विराट-शिखर’

Next

मिरपूर : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशवर ८ गडी राखून मात करत आपणच आशियाचा शेर असल्याची डरकाळी भारताने फोडली. विराट कोहलीची संयमी खेळी आणि शिखर धवनचे दमदार अर्धशतक आणि त्यानंतर आलेल्या धोनीने सहा चेंडूत तडकावलेल्या २० धावांच्या जोरावर भारताने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. 
पावसाच्या व्यत्ययानंतर पंधरा षटकांच्या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलाच्या साबिर रेहमान आणि मेहमुद्दला यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर संघाला १५ षटकात ५ बाद १२० धांवाचा डोंगर उभा करून दिला. मात्र हे आव्हान  भारताने लिलया पेलले. ८ गड्यांनी हरवत भारताने बांगलादेशला त्यांच्याच भूमित नमविले. 
 

गोलंदाजांच्या ‘कमाल’ कामगिरीनंतर फॉर्मशी झगडणाऱ्या शिखर धवनच्या ‘धमाल’ अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने शेर-ए- बांगलावर ‘शेरदिल’ विजय नोंदवला. हायहोल्टेज स्वरूप प्राप्त झालेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशवर ८ गडी आणि ७ चेंडू राखून मात केली. या विजयानंतर भारताने आशिया चषक टी-२० चषकावर नाव कोरले. उल्लेखनीय म्हणजे, स्पर्धेत भारताने अपराजीत कामगिरी केली. बांगलादेशचे ५ बाद १२० धावांचे आव्हान भारतीय संघाने १३.५ षटकांत गाठले. शिखर धवनने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. त्याला विराट कोहलीने उत्कृष्ट साथ दिली. विराट ४१ धावांवर नाबाद राहिला. धवन परतल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार धोनीने दणादण षटकार ठोकले. षटकार ठोकूनच त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने ६ चेंडूंत २० धावा फटकावल्या.
प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात सलामीवीर रोहित शर्मा (१) बाद झाला. त्यानंतर मात्र शिखर धवन (६०) आणि विराट कोहली (नाबाद ४१) या जोडीने चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताचा पाया रचला गेला. त्यावर धोनीने ‘विजयी’ कळस चढवला. बांगलादेशकडून अल-अमिन हसन आणि तस्कीन अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी, अष्टपैलू मेहमुदुल्लाने केलेल्या तडाखेबंद नाबाद ३२ धावांच्या बळावर बांगलादेशने भारतापुढे ५ बाद १२० धावांचे लक्ष्य उभारले होते. या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे उशिरा सुरू झालेला हा सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्यात आला. मेहमुदुल्लासोबत शब्बीर रहमान याने नाबाद ३२ धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ४५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशला शतकी धावसंख्या गाठता आली. त्याआधी, भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेशने १२ षटकांत ७५ धावांत ५ फलंदाज गमावले होते. अशा स्थितीतून सावरत बांगलादेशने शतकी मजल मारली. त्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला तो मेहमुदुल्ला याने. त्याने शानदार फटकेबाजी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत आणले. अवघ्या १३ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने या ३३ धावा फटकावल्या. त्याने १३ व्या षटकात आशिष नेहराच्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर १४ व्या षटकात हार्दिक पंड्याला चौकार आणि दोन षटकार लगावत एकूण २१ धावा कुटल्या. तमीम इक्बालने १३, तर सौम्या सरकारने १४ धावा केल्या. भारताकडून आश्विन, नेहरा, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद
केला. पंड्याला मात्र बळी मिळवता आला नाही.
> भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा आशियाई चषक विजेतेपद जिंकले ज्याचे पहिल्यांदाच टी-२० प्रारुपमध्ये आयोजन केले होते. आधीचे पाचही विजेतेपद ५० षटकांच्या स्पर्धंेमध्ये होते.
> इतर पुरस्कार
कुलेस्ट प्लेयर - विराट कोहली
सामनावीर - शिखर धवन
मालिकावीर - शब्बीर रेहमान
धावफलक :
बांगलादेश : १५ षटकांत ५ बाद १२० धावा : फलंदाजी : तामीम इक्बाल पायचीत गो. बुमराह १३, सौम्या सरकार झे. पंड्या गो. नेहरा १४, शब्बीर रहमान नाबाद ३२, शाकिब अल हसन झे. बुमराह गो. आश्विन २१, मुशफिकीर रहीम धावबाद ४, मशर्रफे मुर्तझा झे. कोहली गो. जडेजा ०, मेहमुदुल्ला नाबाद ३३. अवांतर ३. गोलंदाजी : आश्विन ३-०-१४-१, नेहरा ३-०-३३-१, बुमराह ३-०-१३-१, जडेजा ३-०-२५-१, पंड्या ३-०-३५-०.
भारत : १३.५ षटकांत २ बाद १२२. फलंदाजी : रोहित शर्मा झे. सौम्या सरकार गो. अल हसन १, धवन झे. सौम्या सरकार गो. तस्कीन अहमद ६०, विराट कोहली नाबाद ४०, महेंद्रसिंह धोनी नाबाद २०. अवांतर -०. गोलंदाजी : तस्कीन अहमद ३-०-१४-१, अल हसन ३-०-१३-१, अबू हिडर १-०-१४-०, शाकिब अल हसन २-०-२६-०, मुर्तझा २-०-१६-०, नासीर हुसेन ३-०-२२-०.

(वृत्तसंस्था)

Web Title: India is the lion of Asia, the 'Virat-peak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.