भारत-पाक महिला क्रिकेट मालिका रद्द?
By Admin | Published: October 18, 2016 04:30 AM2016-10-18T04:30:27+5:302016-10-18T04:30:27+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान आयोजित क्रिकेट मालिका रद्द होण्याच्या स्थितीत आहे.
आॅक्टोबरअखेरीस ही मालिका खेळली जाणार होती. या मालिकेच्या आयोजनावर आयसीसी महिला चॅम्पियनच्या गुणांचा निर्णय अवलंबून आहे. बीसीसीआयने पीसीबीला अद्यापही मालिका खेळण्याचे किंवा रद्द करण्याचे संकेत दिलेले नाहीत. मालिका रद्द झाल्यास गुणविभागणीचा निर्णय चॅम्पियनशिपची तांत्रिक समिती घेईल, असे ‘क्रिकइन्फो’च्या वृत्तात म्हटले आहे.
आयसीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पाकच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या मालिकेत सहभागी होण्यास भारताने नकार दिल्यास गुण मिळणार नाहीत. मालिकेत उभय संघांत तीन वन डे खेळले जाणार आहेत. पीसीबी या सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यास इच्छुक आहे. आयसीसी महिला चॅम्पियनशिपनंतर आघाडीच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांचा प्रवेश २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषकात निश्चित मानला जाईल. नंतरच्या चार स्थानांवर राहणाऱ्या संघांना मात्र पात्रता फेरी खेळावी लागेल. भारत-पाकला या महिन्याअखेरपर्यंत मालिका खेळायची आहे. पण मालिका न झाल्यास तांत्रिक समितीकडे अहवाल सोपविला जाईल.
बीसीसीआयने मेपासून आतापर्यंत मालिकेबाबत पीसीबीला स्पष्टीकरण दिलेले नाही. आमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार नसून सरकारच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नसल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)
>लक्षवेधी...
भारतीय पुरुष संघाने पाकविरुद्ध २०१२-१३ पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. तथापि पाकने भारताच्या यजमानपदाखाली झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात आणि वन-डे विश्वचषकासह चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया चषक क्रिकेटमध्ये भाग घेतला होता.
भारत-पाक यांच्यात मे २०१४ मध्ये एक करार झाला. याअंतर्गत उभय देश २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळतील, असे ठरले होते. गतवर्षी डिसेंबरमध्ये पाकच्या यजमानपदाखालीभारताविरुद्ध मालिकेचे आयोजन व्हायचे होते. यावर अनेक खलबते झाल्यानंतर भारताने ही मालिका रद्द केली होती.