टीम इंडियाचा वर्चस्वाचा इरादा

By admin | Published: October 16, 2016 02:58 AM2016-10-16T02:58:16+5:302016-10-16T02:58:16+5:30

कसोटी मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करणारा भारतीय संघ आज रविवारपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत वर्चस्व राखण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

Intentions of Team India | टीम इंडियाचा वर्चस्वाचा इरादा

टीम इंडियाचा वर्चस्वाचा इरादा

Next

धर्मशाळा : कसोटी मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करणारा भारतीय संघ आज रविवारपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत वर्चस्व राखण्याच्या इराद्याने उतरणार आहे. कसोटी मालिकेत नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीऐवजी वन डे मालिकेत महेंद्रसिंह धोनी याच्याकडे संघाची धुरा राहील.
कसोटी मालिका कोहलीने ३-० ने जिंकून दिल्याने आता धोनीवर न्यूझीलंडविरुद्ध ४-१ ने मालिका विजय मिळवून आयसीसी क्रमवारीत तिसरे स्थान मिळविण्याचे दडपण असेल. न्यूझीलंड सध्या ११३ गुणांसह तिसऱ्या आणि भारत ११० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
धोनीला रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवणार आहे. या तिघांना पुढील व्यस्त वेळापत्रकामुळे सध्या विश्रांती देण्यात आली. या तिघांची उणीव भरून काढण्यासाठी जयंत यादव, अक्षर पटेल आणि धवल कुलकर्णी या युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली. हार्दिक पंड्याचेदेखील राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.
पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेला भुवनेश्वर कुमार आणि अनुभवी इशांत शर्मा हे वेगवान गोलंदाजदेखील संघात नाहीत. पण इंदूरमध्ये अखेरच्या कसोटीत २११ धावा ठोकणाऱ्या कोहलीचा आत्मविश्वास उंचावला आहे.
स्वत: धोनीने आॅक्टोबर २०१५ ला द. आफ्रिकेविरुद्ध नाबाद ९२ धावांची मोठी खेळी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा निर्णायक फलंदाजी करीत टीकाकारांची तोंडे बंद करण्याची त्याच्याकडे संधी असेल. व्हायरलमुळे सुरेश रैना आणि अंगठ्याच्या दुखापतीमुळे शिखर धवन हे संघाबाहेर आहेत.
दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याच्यावर सहकाऱ्यांमध्ये उत्साह भरण्याचे आव्हान असेल. कसोटी मालिका गमाविल्याने संघात नाराजी आहे. वेगवान गोलंदाज टीम साऊदी आणि आक्रमक फलंदाज कोरी अँडरसन यांचे संघातील पुनरागमन हे न्यूझीलंडसाठी लाभदायी ठरू शकेल. (वृत्तसंस्था)

लक्षवेधी...
न्यूझीलंडने भारतात कधीही वन डे मालिका जिंकलेली नाही. १९८८, १९९५, १९९९ आणि २०१० अशा चारही मालिकांत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अनेक संघांचा समावेश असलेल्या स्पर्धांमध्ये मात्र न्यूझीलंडने भारतात १८ सामने जिंकले, तर ११ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. द्विपक्षीय मालिकेत मात्र पाहुण्यांना अद्यापही यश आलेले नाही.
२०१० मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडचा ५-० ने सफाया केला होता.
उभय संघांमध्ये आतापर्यंत ९३ सामने झाले. भारताने ४६ आणि न्यूझीलंडने ४१ सामने जिंकले.
पाच सामन्यांचा निकाल लागू शकला नाही, तर एक सामना
टाय झाला होता.
उभय संघांत खेळल्या गेलेल्या मागील पाच वन डेपैकी चार सामन्यांत न्यूझीलंडने बाजी
मारली, हे विशेष. एक सामना टाय झाला होता.

‘मैदानावर कोहलीचा सल्ला मानतो’
टीम इंडियात नेतृत्वाच्या पातळीवर स्थित्यंतराची प्रक्रि या सुरू आहे. वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेदेखील अनुकूल अशी पावले उचलण्यास सुरुवात केली. कसोटी क्रि केटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, माहीकडून संघाची धुरा कोहलीच्या खांद्यावर आली. वन डे आणि टी-२० प्रकारात धोनी स्वत: कर्णधार असला, तरीही कोहली उपकर्णधार आहे. भविष्यातील कर्णधार या नात्याने आतापासूनच मैदानावरील निर्णयांमध्ये कोहलीला अधिकाधिक सहभागी करून घेत असल्याचे धोनीने स्पष्ट केले.
भारत-न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळला जाईल. सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, ‘सामना बारकाईने पाहिला, तर लक्षात येईल, की मैदानावर कोहलीशी मी जास्त चर्चा करू लागलो आहे. एखाद्या निर्णयासंदर्भात त्याची मतेही मी जाणून घेत आहे.’
अर्थात, वरिष्ठ खेळाडू म्हणून संघातील तुमची जबाबदारी वाढलेली असते. मग, तुम्ही उपकर्णधार असा किंवा कर्णधार किंवा खेळाडू. ज्येष्ठ खेळाडू म्हणून अधिकची जबाबदारी असतेच. संघातील युवा खेळाडूंशी चर्चा करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे लागते.’
४२००४ मध्ये कसोटीत पदार्पण केल्यानंतर धोनीने गेल्या वर्षी निवृत्ती घेतली. याविषयी तो म्हणाला, ‘पदार्पणापासून आतापर्यंत क्रि केटचे चित्र खूप बदलले आहे. संघात नवोदित खेळाडू ज्या तयारीने आणि आत्मविश्वासाने येत आहेत, ते पाहून आश्चर्य वाटते. संघातील भूमिका तीच आहे; पण काळानुसार जबाबदारी वाढली आहे.’ न्यूझीलंडविरु द्धच्या वन डे मालिकेसाठी भारताने काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या मालिकेमध्ये माही स्वत: वरच्या क्र मांकावर फलंदाजीस येऊ शकतो. तसे संकेतही त्याने दिले. वरिष्ठ गोलंदाजांच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची धुरा उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर असेल.

टीम इंडियात स्थान मिळणे अवघड आहे. ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या युवा चेहऱ्यांनी संधीचे सोने करणे अपेक्षित आहे. एकीकडे विजय मिळविणे आणि दुसरीकडे नव्या दमाच्या खेळाडूंना घडविणे,
अशी दुहेरी जबाबदारी अनुभवी खेळाडूंवर असेल. दोन्ही आघाड्यांवर काम करताना थोडी धावपळ तर होणारच!
- महेंद्रसिंह धोनी,
कर्णधार

वन डेत कडवे आव्हान देऊ : राँची
भारताने कसोटी मालिकेत आमच्यावर ३-० ने सरशी साधली, पण पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत आम्ही कडवे आव्हान देत पराभवाची परतफेड करण्यास सज्ज असल्याचा इशारा न्यूझीलंडचा फलंदाज ल्यूक राँची याने दिला.
‘वन डे फॉर्मेटमध्ये आमचा खेळ वेगळाच असेल. या दीर्घ दौऱ्याचा शेवट आम्हाला विजयाने करायचा आहे, असे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. वन डे मालिकेतील खेळ वेगळाच असतो, असे सांगून राँची म्हणाला, ‘पराभवाचे शल्य मागे टाकून आमचे लक्ष मालिका विजयाकडे असेल.’



आमचा वन डे संघ चांगला असल्याने खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ केल्यास भारताला मालिकेत पराभूत करणे कठीण जाणार नाही. टीम इंडियापुढे प्रत्येक सामन्यात आव्हान उभे करण्याचे आमचे डावपेच असल्याने ही मालिका रोमहर्षक होईल, यात शंका नाही.’(वृत्तसंस्था)

उभय संघ :
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मनीष पांडे, जयंत यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, केदार जाधव, मनदीपसिंग, अमित मिश्रा, धवल कुलकर्णी, उमेश यादव आणि हार्दिक पंड्या.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, अँटन डेव्हसिच, मार्टिन गुप्टिल, टॉम लॅथम, मॅट हेन्री, जेम्स निशाम, ल्यूक राँची, मिशेल सँटेनर, ईश सोढी, रॉस टेलर, बीजे वॉटलिंग आणि टीम साऊदी.

Web Title: Intentions of Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.