कोहलीच्या शतकाने भारत मजबूत
By admin | Published: July 22, 2016 03:07 AM2016-07-22T03:07:50+5:302016-07-22T12:36:38+5:30
वेस्ट इंडिज विरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरीस भारताने ४ बाद ३०२ धावा केल्या.
ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. 22 - कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद १४३ धावा आणि त्याने शिखर धवन (८४) सोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर वेस्ट इंडिज विरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरीस भारताने ४ बाद ३०२ धावा केल्या. खेळ थांबला त्यावेळी रविचंद्रन अश्विन २२ धावांवर खेळत होता. विंडीजच्या बिशूने १०८ धावांत ३ बळी घेतले.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या प्रगल्भ खेळाचे दर्शन घडवताना आज कसोटी कारकिर्दीतील १२ वे शतक झळकावले. १९७ चेंडू खेळताना त्याने १६ चौकार ठोकले. विशेष म्हणजे हे त्याचे कर्णधार म्हणून अकराव्या कसोटीतील पाचवे शतक ठरले. शिवाय विराटने आज कर्णधार म्हणून कसोटीतील हजार धावांचा टप्पा पार केला. यासाठी त्याने १८ इनिंग्ज खेळल्या आहेत. सुनील गावसकर यांनी १४ तर महेंद्रसिंग धोनीने १८ इनिंग्जमध्ये ही कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजमध्ये कर्णधार म्हणून राहुल द्रवीडने सर्वाधिक १४६ धावा केल्या आहेत. हा विक्रम मागे टाकण्यासाठी कोहलीला फक्त ४ धावांची आवश्यकता आहे.