कोहलीचं द्विशतक, भारताची ५०० धावांकडे वाटचाल
By admin | Published: October 9, 2016 10:35 AM2016-10-09T10:35:16+5:302016-10-09T14:13:13+5:30
विराट कोहलीने आपल्या कारर्किदितील दुसरे दविशतक झळकावले आहे. भारतातर्फे असा पराक्रम करणारा कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे.
ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. ९ : न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची दमदार फलंदाजी सुरूच आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने ३ बाद ४५१ अशी मजल मारली आहे. विराट कोहलीने आपल्या कारर्किदितील दुसरे द्विशतक झळकावले आहे. भारतातर्फे असा पराक्रम करणारा कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे. कोहलीपाठोपाठ रहाणेनेदेखील १६० धावा पूर्ण केल्या आहेत. आणि त्याची द्विशतककडे वाटचाल सुरु आहे. कोहलीने १९ चौकार लगावत २०४ धावा केल्या. तर रहाणेने १४ चौकार आणि ४ षटकारांसह १६० धावा झळकावल्या आहेत. त्यामुळे भारताच्या ४५० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत.
विराट कोहली -रहाणेने अप्रतिम फलंदाजी केली. बचाव आणि आक्रमणाचा सुंदर ताळमेळ साधत रहाणेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कोहली आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी ३५३ धावांची भागिदारी रचली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी आतापर्यंत भारताकडून इतकी मोठी भागिदारी झाली नव्हती. तब्बल १०९ हून अधिक षटके कोहली आणि रहाणे मैदानात आहे. न्यूझीलंडच्या वेगवान आणि फिरकी माऱ्याचा समर्थपणे मुकाबला करत कोहली आणि रहाणेने भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. त्याआधी, भारताची ३६ षटकांत ३ बाद १०० अशी स्थिती होती.
दरम्यान, दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करीत असलेल्या गौतम गंभीरने (२९) शानदार सुरुवात करताना मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर दोन षटकार लगावले, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. मुरली विजयला (१०) जीतन पटेलने झटपट माघारी परतले, तर चेतेश्वर पुजाराला (४१) मिशेल सँटेनरने तंबूचा मार्ग दाखवला. त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.