दिल्लीत शेवटचा सामना खेळून निवृत्त नाही झालो ही आयुष्यभराची खंत
By Admin | Published: October 31, 2015 07:10 PM2015-10-31T19:10:23+5:302015-10-31T19:10:23+5:30
निरोपाचा सामना दिल्लीत खेळायला मिळाला असता तर मी सन्मानानं निवृत्त झालो असतो, ती संधी मला निवड समितीने दिली नाही अशी खंत विरेंद्र सेहवागने व्यक्त केली आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - निरोपाचा सामना दिल्लीत खेळायला मिळाला असता तर मी सन्मानानं निवृत्त झालो असतो, ती संधी मला निवड समितीने दिली नाही अशी खंत विरेंद्र सेहवागने व्यक्त केली आहे. अत्यंत दिमाखदार अशी क्रिकेट कारकिर्द गाजवलेल्या सेहवागने ही सल आयुष्यभर राहील असेही मत व्यक्त केले आहे. मला संघातून डच्चू मिळणार आहे, हे जर मला वेळीच सांगण्यात आलं असतं तर मी त्यांना दिल्लीमध्ये निरोपाच्या कसोटीत खेळू द्यावं अशी विनंती केली असती, परंतु मला तसं कळवण्यात न आल्यामुळे मला तशी संधीच मिळाली नसल्याचं विरून खेदानं व्यक्त केलंय.
क्रिकेट खेळत असताना निवृत्त होण्याची संधी मला मिळाली नाही याची कायम खंत राहील असं तो म्हणाला. एका टिव्ही शोमध्ये बोलताना खेळामध्ये हे असं चालतंच असं म्हटलं आणि आपण कधी निवृत्त व्हायचं याचा मी विचारही केला नव्हता असंही सांगितलं.
मला फक्त एवढंच विचारायचंय की ज्या खेळाडूने देशासाठी १२ - १३ वर्षे खेळ केला त्याला सन्मानानं क्रिकेटच्या मैदानावर निरोप मिळायला हवा की नाही? बीसीसीआय येत्या दिल्ली सामन्याच्या दरम्यान सेहवागसाठी सत्काराचं आयोजन करत आहे, ही चांगली बाब आहे असं तो म्हणाला.