आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे सांघिक विजेतेपद

By admin | Published: May 25, 2017 01:20 AM2017-05-25T01:20:19+5:302017-05-25T01:20:19+5:30

यंदाचा आयपीएल अंतिम सामना गेल्या १० वर्षातील सर्वात थरारक सामना होता, यावर कोणाचेही दुमत नाही

Mumbai Indians team championship in IPL | आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे सांघिक विजेतेपद

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे सांघिक विजेतेपद

Next

अयाझ मेमन , संपादकीय सल्लागार

यंदाचा आयपीएल अंतिम सामना गेल्या १० वर्षातील सर्वात थरारक सामना होता, यावर कोणाचेही दुमत नाही. तसं बघायला गेलं तर अखेरच्या चेंडूवर सामना संपणे हे टी-२० प्रकाराला काही नवीन नाही, पण स्पर्धेतील सर्वात निर्णायक सामन्याचा निकाल अशा पद्धतीने लागतो हेच यातील दबाव सिद्ध करतो. या सामन्याचा थरार इतक्या उच्च दर्जाला पोहोचला होता, की खेळाडू आणि पाठीराख्यांवरील दबाव प्रचंड जाणवत होता.
विशेष म्हणजे या सामन्यात जवळपास ९० टक्के खेळ पाहून मुंबई इंडियन्सचे तिसरे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आणि रायझिंग पुणे सुपरजायंट चमकदार जेतेपद पटकावणार,
असेच चित्र होते. पण, मुंबईने अखेरपर्यंत हार मानली नाही आणि अखेरच्या ३-४ षटकांमध्ये सामन्याचे चित्र पालटताना अवघ्या एका धावेने बाजी मारली. नक्कीच पुण्याच्या संघाचे ‘हार्ट ब्रेक’ झाले, पण अडचणीत आल्यानंतरही मुंबईने अवघ्या १२९ धावांचे केलेले यशस्वी संरक्षण लक्षवेधी ठरले.
मुंबईचे विजेतेपद नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु हे सर्व शक्य झाले ते जबरदस्त संघनिवड, अप्रतिम योजना आणि मेहनत यामुळे. अनेकदा त्यांच्या कामगिरीने केवळ क्रिकेट नाही, तर इतर क्षेत्रासाठीही प्रयत्न करण्याची शिकवण दिली. मुंबईच्या संघनिवडीने विजेतेपद जिंकण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते हे सांगितले.
सामान्यपणे सांगायचे झाल्यास, मुंबईचा संघ सर्वात समतोल होता. त्यामुळेच, एक किंवा त्याहून अधिक खेळाडू विश्रांतीमुळे किंवा दुखापतीमुळे संघाबाहेर बसले तरी अंतिम अकरामध्ये त्याचा परिणाम घडला नाही. जर, जोस बटलर खेळू शकला नाही, तर त्याची जागा घ्यायला लेंडल सिमन्स सज्ज होता. त्याचप्रमाणे मिशेल मॅक्लेनघनच्या जागी मिशेल जॉन्सन आणि हरभजन सिंगच्या जागी कर्ण शर्मा असे अनेक पर्याय मुंबईकडे उपलब्ध होते. तसेच, मुंबईची बेंच स्टे्रंथही मुख्य संघाइतकीच मजबूत होती.
त्यामुळे, मुंबईच्या कामगिरीत शक्यतो घसरण झाली नाही. कॉर्पोरेट भाषेत सांगायचे झाल्यास भविष्यातील विचार यामागचे गुपित आहे. सातत्यपूर्ण कामगिरी आणि दीर्घ काळापर्यंत संघासाठी योगदान
देणे अशा गोष्टी विचारात ठेवून
खेळाडू रिटेन केले किंवा निवडले. तसेच योजनांबाबत सांगायचे झाल्यास, मुंबई संघ सर्वात
कल्पक आणि स्वयंप्रेरित सहजरीत्या भासला नाही आणि यामागचे कारण म्हणजे ते सातत्याने विजयी होत होते. यामागे कोणताही नाट्यमय प्रसंग नव्हता. अनुभवी हरभजन सिंगच्या ऐवजी कर्ण शर्माला पसंती देणे, काहीसा जुगार होता. पण, हे ठरलेले होते. तसेच, कृणाल पांड्याला प्लेआॅफमध्ये खेळविणे, अखेरचे षटक बुमराह किंवा मलिंगाच्याऐवजी जॉन्सनला देणे हेदेखील अपेक्षित होते.
शेवटी सांगायचे म्हणजे हे सर्व खेळाडूंची जिद्द होती, की कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. त्यामुळेच अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्येही मुंबईचा विजय पाहायला मिळाला. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला पाहिजे, की मुंबईचा एकही फलंदाज अव्वल ५ फलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकला नाही आणि जसप्रीत बुमराह अव्वल ५ गोलंदाजांमध्ये येणारा एकमेव खेळाडू ठरला. परंतु, एकूण मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतर खेळाडूंच्या तुलनेत अधिक सामनावीर पुरस्कारविजेते ठरले. थोडक्यात हे सर्व काही यश उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे आहे.

Web Title: Mumbai Indians team championship in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.