पाकला ‘हायव्होल्टेज’ झटका

By admin | Published: June 5, 2017 03:50 AM2017-06-05T03:50:44+5:302017-06-05T03:50:44+5:30

ब गटाच्या एकतर्फी लढतीत आज येथे पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १२४ धावांनी पराभव करताना विजयी प्रारंभ केला.

Pakalah 'highway' shock | पाकला ‘हायव्होल्टेज’ झटका

पाकला ‘हायव्होल्टेज’ झटका

Next

बर्मिंगहम : फलंदाजांनी सुरेख कामगिरी केल्यानंतर गत चॅम्पियन भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पावसाचा तीनदा व्यत्यय आलेल्या ब गटाच्या एकतर्फी लढतीत आज येथे पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १२४ धावांनी पराभव करताना विजयी प्रारंभ केला.
डकवर्थ लुईस नियमानुसार ४१ षटकांत २८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३३.४ षटकांत १६४ धावाच करू शकला. पाकिस्तानकडून अजहर अलीने सर्वाधिक ५0 व मोहंमद हाफीजने ३३ धावांचे योगदान दिले. भारताकडून उमेश यादवने ३0 धावांत ३ गडी बाद केले. रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार सामन्यांत पाकिस्तानविरुद्धचा हा भारताचा दुसरा विजय आहे. दोन सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्याआधी भारताने रोहित शर्मा (९१), कर्णधार विराट कोहली (नाबाद ८१), सलामीवीर फलंदाज शिखर धवन (६८) आणि युवराजसिंग (५३) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ३ बाद ३१९ धावा केल्या.
भारतातर्फे रोहित शर्माने सर्वाधिक ११९ चेंडूंत ७ चौकार व २ ठोकले आणि शिखर धवन (६८) याच्या साथीने सलामीसाठी १३६ धावांची भागीदारी करीत संघाच्या विशाल धावसंख्येचा मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (नाबाद ८१) आणि युवराजसिंग (५३) यांनी तिसऱ्या गड्यासाठी अवघ्या ९.४ षटकांत ९३ धावांचा पाऊस पाडत भारतीय संघाला ३00 धावांचा पल्ला पार करून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. कोहलीने ६८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार मारले, तर युवराजने ३२ चेंडूंच्या खेळीत ८ चौकार व एक षटकार मारला. हार्दिक पंड्या याने अवघ्या ६ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २0 धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत अखेरच्या २४ चेंडूंत ७२ धावांचा पाऊस पाडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे सलामीवीर अजहर अली आणि अहमद शहजाद यांनी ४.५ षटकांत २२ धावांची भागीदारी केली तेव्हा पावसाचे आगमन झाले आणि सामना थांबवावा लागला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा पाकिस्तानला ४१ षटकांत २८९ धावांचे लक्ष्य मिळाले. भुवनेश्वरने भारताला पहिले यश मिळवून देताना अहमद शहजाद (१२) याला पायचीत केले, तर उमेश यादवने बाबर आजम (८) याला बॅकवर्ड पॉइंटवर जडेजाकरवी झेलबाद करीत भारताला दुसरे यश मिळवून दिले. अजहरदेखील सुदैवी ठरला. त्याला ३७ धावांवर पंड्याच्या गोलंदाजीवर भुवनेश्वरने जीवदान दिले. तथापि, याचा फायदा तो घेऊ शकला नाही. तो ५0 धावांवर जडेजाच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर पंड्याच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. शोएब मलिकने २ पंड्याला सलग दोन चौकार मारत पाकिस्तानचे धावांचे शतक २२ व्या षटकात लगावले; परंतु तो उमेशच्या अचूक थेटफेकीवर धावबाद झाल्याने पाकिस्तानची स्थिती ४ बाद ११४ अशी झाली. जम बसलेला मोहंमद हफीज व कर्णधार सर्फराज अहमद तंबूत परतल्यानंतर पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी १३५ धावांची गरज होती व हे लक्ष्य त्यांच्यासाठी अशक्य ठरले.
>धावफलक
भारत : रोहित शर्मा धावबाद (बाबर आझम/सर्फराज अहमद) ९१, शिखर धवन झे. अझहर अली गो. शादाब खान ६८, विराट कोहली नाबाद ८१, युवराज सिंग पायचीत गो. हसन अली ५३, हार्दिक पंड्या नाबाद २0. एकूण : ४८ षटकांत ३ बाद ३१९. गडी बाद क्रम : १-१३६ (शिखर धवन, २४.३), २-१९२ (रोहित शर्मा, ३६.४). ३-२८५ (युवराज सिंग, ४६.२). गोलंदाजी : मोहंमद आामर ८.१-१-३२-0, इमाद वसीम ९.१-0-६६-0, हसन अली १0-0-७0-१, वहाब रियाज ८.४-0-८७-0, शादाब खान १0-0-५२-१, शोएब मलिक २-0-१0-0.
पाकिस्तान : अजहर अली झे. पंड्या गो. जडेजा ५0, शहजाद पायचीत गो. कुमार १२, आझम झे. जडेजा गो. यादव ८, हाफीज झे. कुमार गो. जडेजा ३३, शोएब मलिक धावबाद १५, सर्फराज अहमद झे. धोनी गो. पंड्या १५, इमाद वसीम झे. जाधव गो. पंड्या 0, शादाब खान नाबाद १४, मोहंमद आमीर झे. जाधव गो. यादव ९, हसन अली झे. धवन गो. यादव 0, वहाब रियाज (अ‍ॅबसेंट हर्ट), अवांतर : ८, एकूण : ३३.४ षटकांत सर्वबाद १६४. गडी बाद क्रम : १-४७ (शहजाद, ८.६), २-६१ (आजम, १२.२), ३-९१ (अझहर अली, २0.५), ४-११४ (मलिक, २३.३), ५-१३१ (हाफीज, २६.३), ६-१३५ (इमाद वसीम, २७.३), ७-१५१ (सर्फराज अहमद, २९.३), ८-१६४ (मोहंमद आमेर, ३३.२), ९-१६४ (हसन अली, ३३.४). गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-१-२३-१, उमेश यादव ७.४-१-३0-३, बुमराह ५-0-२३-0, पंड्या ८-0-४३-२, जडेजा ८-0-४३-२.
>पाकची धुलाई
पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस निमंत्रित केले. त्यानंतर रोहित आणि धवनने वेगवान गोलंदाज मोहंमद आमीर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वसीमसमोर संथ सुरुवात केली. भारतीय संघ पहिल्या पाच षटकांत फक्त १५ धावा करू शकला व त्यात एकमेव चौकार रोहितने आमीरला मारला. रोहित जास्त संथ खेळला; परंतु लय मिळाल्यावर त्याने वसीम आणि हसन अली (७0 धावांत १ बळी) चौकार ठोकला. भारताची स्थिती ९.५ षटकांत बिनबाद ४६ असताना पावसाचे आगमन झाले. त्यामुळे जवळपास ५0 मिनिटे खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर रोहितने हसनला चौकार ठोकत ११ व्या षटकात भारताचे अर्धशतक धावफलकावर लगावले. रोहितने शादाब खान (५२ धावांत १ बळी) याला षटकार ठोकत ७१ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.धवननेही वेगवान गोलंदाज वहाब रियाज याचा समाचार घेताना त्याला सलग तीन चौकार व पुढील चेंडूंवर २ धावा घेत ४८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. धवनने शादाबला षटकारही ठोकला; परंतु याच फिरकी गोलंदाजाला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेवर अजहर अलीच्या हाती झेल देऊन बसला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराटने चौकार ठोकत २८ व्या षटकांत भारताचे दीड शतक धावफलकावर लावले. ३३.१ षटकांत १ बाद १७३ अशी धावसंख्या असताना पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले आणि त्यानंतर सामना ४८ षटकांचा करण्यात आला.रोहितने वहाबला सलग चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकत धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला; परंतु कोहलीसोबत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. त्यानंतर युवराजने वहाबला चौकार ठोकत ३८ व्या षटकात भारताला २00 धावांचा पल्ला पार करून दिला. तथापि, तो शादाबच्या चेंडूंवर सुदैवी ठरला. त्याला लाँग आॅफवर हसन अली याने जीवदान दिले. कोहलीला मात्र धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच युवराजसिंग पूर्ण लयीत खेळत होता. कोहलीला ४३ धावांवर वहाबच्या गोलंदाजीवर जीवदानही मिळाले. यादरम्यान युवराजने मोहम्मद आमीरला चौकार आणि हसन अली याला सलग दोन चौकार ठोकले. हसन अलीच्या ४५ व्या षटकांत कोहलीने षटकार ठोकत ५८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच षटकांत युवराजनेही दोन चौकार मारले.
भारताच्या यशाचे गमक : भक्कम भागिदाऱ्या
पाकिस्तानपुढे ३१९ धावांचा डोंगर उभा करण्यात भारताला यश आले, याचे मुख्य कारण म्हणजे भारताकडून झालेल्या भागिदाऱ्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी शतकी (१३६) भागीदारी करुन भक्कम पायाभरणी केल्यावर इतर फलंदाजांनी या प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन बिनधास्त आणि तडाखेबंद फलंदाजी केली. त्यानंतर रोहित आणि विराटने अर्धशतकी (५६) धावांची भागीदारी केली. ही भागीदारी काहीशी संथगतीने म्हणजे ४.६0 च्या स्ट्राईक रेटने झाली असली तरी यामुळे डावाला स्थिरता आली. अनुभवी युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या ९३ धावांच्या भागीदारीमुळे भारतीय डावाला आकार आला. शेवटी विराट आणि हार्दिक पांड्या यांनी शेवटच्या १0 चेंडूत केलेल्या ३४ धावांमुळे भारतीय धावफलक भीमसेन सँडोसारखा स्ट्राँग भासू लागला. नेमकी हिच गोष्ट पाकिस्तानी डावात घडली नाही. त्यांच्याकडून एकही अर्धशतकी भागीदारी झाली नाही.
>क्षेत्ररक्षणात सुधारणेला वाव : कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पावसाचा व्यत्यय आलेल्या लढतीत पाकिस्तानला १२४ धावांनी लोळवल्यानंतर आपल्या फलंदाजांची प्रशंसा केली; परंतु त्याने क्षेत्ररक्षणात सुधारणेला वाव असल्याचेही सांगितले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी आज कमीत कमी तीन झेल सोडले. तसेच मैदानी क्षेत्ररक्षणही दर्जेदार नव्हते. भारताच्या विजयानंतर कोहली म्हणाला, ‘चेंडू आणि बॅटीने आम्ही चांगली कामगिरी केली. मी १0 पैकी ९ गुण देईल; परंतु क्षेत्ररक्षणात आम्ही आज सहा गुणांबरोबरच होतो. सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळताना आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल.’ फलंदाजांच्या कामगिरीविषयी तो म्हणाला, ‘शिखर, रोहितने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. गेल्या वेळेसही आम्ही येथे जिंकलो होतो. तेव्हाही सलामीवीरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. रोहितने थोडा वेळ घेतला; परंतु तो दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे आयपीएलपेक्षा वेगळे आहे.
>युवराज, विराटचे जीवदान पडले महागात
युवराजला आठ धावांवर खेळत असताना शहदाब खानच्या गोलंदाजीवर हसन अली याने जीवदान दिले. ४३ या वैयक्तिक धावांवर विराट कोहली याला वहाब रियाज याच्या गोलंदाजीवर झमन याने जीवदान दिले. या दोघांनी मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना पाकिस्तानी गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला करताना तिसऱ्या गड्यासाठी ९.६२ च्या सरासरीने ९३ धावांची भागीदारी केली.
भारतीय डावात पावसाचा दोनदा व्यत्यय
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. ९.५ षटकांचा खेळ होताच पावसाचा व्यत्यय आला. त्या वेळेस भारताने ९.५ षटकांत बिनबाद ४६ धावा केल्या होत्या. त्या वेळेस रोहित शर्मा २५ व शिखर धवन २0 धावांवर खेळत होते.
३३.१ षटकानंतर दुसऱ्यांदा पावसाचा व्यत्यय आला. त्या वेळेस भारताच्या १ बाद १७३ धावा होत्या. त्या वेळेस विराट २४ व रोहित ७७ धावांवर खेळत होते.
>६८ सलामीवीर रोहित शर्मा याने २0१२ आशिया चषक स्पर्धेतील सर्वोत्तम ६८ धावांची खेळी रविवारी मागे टाकली. त्याने पाकिस्तानविरुद्ध १२ वन-डे सामन्यांत ५ अर्धशतके ठोकली आहेत. रोहितने ११९ चेंडूंत ७ चौकार व २ षट्कारांसह ९१ धावा केल्या.
विजय मल्ल्याची उपस्थिती... चर्चेचा विषय
भारतीय बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून पलायन केलेल्या भारतीय मद्यसम्राट विजय मल्ल्याचे सध्या लंडनमध्ये वास्तव्य असून तो भारत पाकिस्तान सामना पाहण्यास उपस्थित होता. यावेळी त्याने माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचीही भेट घेतल्याचे छायाचित्रातून दिसत होते. त्याची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता. सोशल मिडियावरुन त्याच्या उपस्थितीची छायाचित्रे व्हायरल झाली. नेटिजन्सनी त्यावर वेगवेगळया कॉमेंटही दिल्या.

Web Title: Pakalah 'highway' shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.