पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ पाठवण्याचा निर्णय ठेवला राखून
By admin | Published: March 9, 2016 09:04 AM2016-03-09T09:04:40+5:302016-03-09T09:04:40+5:30
भारतीय सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सुरक्षेचं सार्वजनिक आश्वासन दिलं तरच पाकिस्तान संघ भारतात येईल असं पाकिस्तान सरकारने सांगितल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
कराची, दि. ९ - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. पाकिस्तानी संघ वर्ल्ड कप टी20 साठी भारतात येणार आहे. मात्र सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तान सरकारने चिंता दर्शवली आहे. भारतीय सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सुरक्षेचं सार्वजनिक आश्वासन दिलं तरच पाकिस्तान संघ भारतात येईल असं पाकिस्तान सरकारने सांगितल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
पाकिस्तान अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांना भारतात आलेल्या सुरक्षा पथकाने माहिती दिली आहे. पाकिस्तान सरकार बुधवारी यावर निर्णय घेईल असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन शहरयार खान यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघ आज लाहोरहून दिल्लीसाठी रवाना होणार होता मात्र काही खेळाडूंनी सध्या थांबण्यास सांगितलं असल्याचं पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन शहरयार खान यांनी बीसीसीआय आणि आयसीसीला धरमाशाला येथे होणारी क्रिकेट मॅच दुसरीकडे खेळवण्याची विनंती केली आहे. धरमशालाऐवजी कोलकाता किंवा मोहाली येथे हा सामना खेळवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. धरमशाला येथे सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानने ही मागणी केली आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी मात्र आम्ही सुरक्षा पुरवण्यास समर्थ असल्याचं सांगितलं होतं.