राहुलचे दिमाखदार शतक, भारत मजबूत स्थितीत !

By Admin | Published: July 31, 2016 10:24 PM2016-07-31T22:24:31+5:302016-08-01T00:19:34+5:30

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलनं शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. कसोटी क्रिकेटमधली लोकेश राहुलची ही तिसरे शतक आहे.

Rahul's glorious hundred, India in strong position! | राहुलचे दिमाखदार शतक, भारत मजबूत स्थितीत !

राहुलचे दिमाखदार शतक, भारत मजबूत स्थितीत !

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

किंग्सटन, दि. ३१ - वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलनं शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. कसोटी क्रिकेटमधील लोकेश राहुलचे हे तिसरे शतक आहे. याआधी लोकेश राहुलनं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे राहुलनं ही तिन्ही शतकं भारताबाहेर केली आहेत. राहुलच्या शतकामुळे भारत आता मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात यजमानांच्या १९६ धावांचा पाठलाग करताना भारतानं दमदार सुरुवात केली. 
शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा भारताने ६१ षटकांत १ गड्याच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारत १३ धावांनी पिछाडीवर आहे. भारताच्या हातात ९ विकेट्स आहेत. राहुलच्या शतकी खेळीमुळे दुसऱ्या कसोटीत भारताने आपली पकड मजबूत केली आहे. राहुल १९२ चेंडूंत १२ चौकार आणि १ षटकारासह १०५ धावांवर खेळत आहे. तर पुजारा ३७ धावांवर असून तो राहुलला चांगली साथ देत आहे. 
दरम्यान, पहिल्या दिवशी विंडीजच्या १९६ धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद १२६ धावा केल्या होत्या. के. एल. राहुल ७५ धावांवर तर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर खेळत होते.
मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात संधी मिळालेल्या राहुलने संधीचे सोने केले. त्याने ५८ चेंडूंत अर्धशतक झळकावले. दुसरा सलामीवीर शिखर धवन आज मोठी खेळी करू शकला नाही. परंतु त्याने २७ धावा करताना राहुलला चांगली साथ दिली. डॅरेन ब्राव्होने रसेल चेसच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.
 
पहिल्या डावात भारत अजून ७० धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ९ गडी बाद व्हायचे आहेत.
 
तत्पूर्वी, भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ५२ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी ५२.३ षटकांत केवळ १९६ धावांत गुंडाळले. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन तर अमित मिश्राने एक बळी घेत अश्विनला मदत केली. विंडीजच्या ब्लॅकवूडने ६२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याची खेळी सर्वोत्तम ठरली. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले.
 
सबीना पार्कच्या हिरव्यागार पीचवर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डनचा नाणेफेकीचा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला. ईशांत तिसऱ्या षटकांतच सलग दोन बळी घेतले. अवघ्या ६ षटकांत विंडीजने ३ फलंदाज गमावले. दोन धक्क्यांमुळे विंडीजची अवस्था ६ षटकांत ११ धावांत ३ बळी, अशी झाली होती. सलामीवर ब्रेथवेट १, तर ब्राव्होला एकही धाव काढता आली नाही. दोघेही ईशांतचे बळी ठरले. 
 
तिसरा धक्का मोहंमद शमीने दिला. त्याने चंद्रिकाला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्लोन सॅम्युअल्स (१४) आणि जर्मेइन ब्लॅकवूड (६२) यांनी चौथ्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. यामध्ये ब्लॅकवूडने महत्त्वपूर्ण ६२ धावांचे योगदान दिले. उपाहारापूर्वी त्याला अश्विनने पायचित केले. जलदगती गोलंदाजांनी आघाडीची फळी कापून काढल्यानंतर विंडीजच्या उर्वरित संघाला रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुरफटवले.
 
भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ९२ धावांनी जिंकला होता. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी लोकेश राहुल याला संधी दिली. तर, होल्डरने कार्लोस ब्रेथवेटच्या जागी मिगेल कमन्सिला संधी दिली. 

Web Title: Rahul's glorious hundred, India in strong position!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.