रोहित शर्मा, शमीचे पुनरागमन

By admin | Published: May 9, 2017 12:33 AM2017-05-09T00:33:49+5:302017-05-09T00:33:49+5:30

गत चॅम्पियन भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ खेळाडूंच्या जाहीर संघात अनुभवी व ओळख असलेल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Rohit Sharma, Shami's comeback | रोहित शर्मा, शमीचे पुनरागमन

रोहित शर्मा, शमीचे पुनरागमन

Next

नवी दिल्ली : गत चॅम्पियन भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ खेळाडूंच्या जाहीर संघात अनुभवी व ओळख असलेल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यात फिटनेस सिद्ध करणारा रोहित शर्मा, मोहंमद शमी यांचे पुनरागमन झाले, तर मनीष पांडे यालाही स्थान मिळाले आहे.
जांघेला झालेल्या दुखापतीतून सावरणाऱ्या रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. कारण, निवड समितीने अनुभवाला प्राधान्य दिले आहे. यंदाच्या मोसमात मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेत इंग्लंडचा पराभव करणाऱ्या संघावर एम. एस. के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विश्वास दाखविला असल्याचे चित्र आहे.
इंग्लंडमध्ये १ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ पहिली लढत ४ जून रोजी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात पांडेने अतिरिक्त फलंदाज म्हणून स्थान मिळविले आहे.
एम. एस. के. प्रसाद म्हणाले, ‘‘निवड समितीने कुलदीप यादवच्या नावाचा गांभीर्याने विचार केला. त्यानंतर त्याचा राखीव खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला. कुलदीप प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकित करणारा खेळाडू ठरला असता; पण भारतीय संघ दोन फिरकीपटूंना संधी देईल का, हा प्रश्न विचार करण्यास भाग पाडणारा होता. युवराजसिंग व केदार जाधव फिरकी गोलंदाजी करू शकतात; त्यामुळे कुलदीपची संधी हुकली. याव्यतिरिक्त यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत, दिनेश कार्तिक, शार्दूल ठाकूर आणि सुरेश रैना यांच्या नावाचा विचार करण्यात आला. कुलदीपसह या चार खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे.
प्रसाद यांनी स्पष्ट केले, की आयपीएल मायदेशात खेळली जाणारी आघाडीची स्पर्धा आहे; पण ५० षटकांच्या स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यासाठी केवळ ही स्पर्धा म्हणजे एकमेव निकष नाही.
प्रसाद म्हणाले, ‘‘आयपीएलचा आम्ही आदर करतो; पण ५० षटकांच्या क्रिकेटसाठी स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या इंग्लंडमधील परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी केवळ आयपीएलच नाही, तर गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आधार घेणे आवश्यक आहे.’’ संघात आश्चर्यचकित करणारे कुठलेही बदल नाहीत. गेल्या चार महिन्यांत संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, असेही प्रसाद म्हणाले.
प्रसाद यांनी सांगितले, की एखादा खेळाडू मागे-पुढे असू शकतो; पण हा सर्वोत्तम संघ आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करीत असलेला अनुभवी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरच्या नावाची चर्चा झाली नाही. गंभीरबाबत विचारले असता प्रसाद म्हणाले, ‘‘सध्या आम्ही शिखर धवन व रोहित शर्मा यांची सलामीची जोडी म्हणून निवड केली आहे आणि अजिंक्य रहाणे बॅकअप सलामीवीर फलंदाज असेल.’’ स्पोर्ट्स हर्नियाच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर असलेला फिरकीपटू रविचंद्रन आश्विन याचा संघात समावेश करण्यात आला. आयपीएलमध्ये कोहली व जडेजा यांना विश्रांती देण्याबाबत विचारले असता प्रसाद म्हणाले, ‘‘विराट अखेरच्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींमध्येही तो खेळला नव्हता. आम्ही जडेजाला ब्रेक दिला होता; पण तो फिट आहे. त्यामुळे कुठली अडचण नाही. महेंद्रसिंह धोनी यष्टिरक्षक म्हणून भारताची प्रथम पसंती आहे.’’ (वृत्तसंस्था)
‘चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंची ओळख
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये १ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंची संक्षिप्त ओळख.
विराट कोहली : संघाचा कर्णधार व प्रमुख फलंदाज. कोहली फॉर्मात असेल तर सर्वांत अधिक विश्वासपात्र मॅचविनर. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरतर्फे आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर विजयासाठी आतुर. वन-डे क्रिकेटमध्ये सरासरी ५३.११ आणि १७९ सामन्यांत ७७५५ धावा. त्यात २७ शतके व ३९ अर्धशतकांचा समावेश.
शिखर धवन : या डावखुऱ्या फलंदाजाला खराब फॉर्ममुळे बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये ‘ब’ दर्जाचा करार मिळाला. ७६ वन-डे मध्ये ४२.९१ च्या सरासरीने ३०९० धावा. त्यात ९ शतके व १७ अर्धशतकांचा समावेश.
महेंद्रसिंह धोनी : फलंदाज म्हणून गेल्या काही दिवसांपासून तो सूर गवसण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण तो भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनीही धोनी सर्वोत्तम यष्टिरक्षक असल्याचे म्हटले आहे. आयपीएलमध्ये पुणे संघातर्फे एका डावात त्याने ६१ धावांची खेळी केली आहे. वन-डेमध्ये २८६ सामने खेळताना ५०.९६ च्या सरासरीने ९२७५ धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे : वन-डे क्रिकेटमध्ये रहाणेला आपल्या प्रतिभेला योग्य न्याय देता आलेला नाही. ७३ वन-डे सामन्यांत त्याने ३२.४२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळाले तर त्याच्यावर आपली उपयुक्तता सिद्ध करण्याचे दडपण राहील.
केदार जाधव : आयपीएलमध्ये त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, पण त्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. आतापर्यंत १५ वन-डे सामने खेळताना त्याने ५८.५० च्या सरासरीने ४६८ धावा केल्या आहेत.
हार्दिक पंड्या : संघातील वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू. इंग्लंडमध्ये तो उपयुक्त ठरू शकतो. सात वन-डे सामन्यांत १६० धावा आणि ९ बळी घेतले आहेत.
आर. आश्विन : भारताचा प्रमुख फिरकीपटू. दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सहभागी होता आले नाही. आतापर्यंत १०५ वन-डे सामन्यांत १४५ बळी घेतले आहेत.
रोहित शर्मा : जांघेला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागम करणाऱ्या रोहित शर्माने सलामीवीर फलंदाज केएल राहुलचे स्थान घेतले. राहुल खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. रोहितने आतापर्यंत १५३ वन-डे सामन्यांत ४१.३७ च्या सरासरीने ५१३१ धावा फटकावल्या आहेत.
युवराज सिंग : आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करीत आहे. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यांत १२७ चेंडूंमध्ये १५० धावांची खेळी करीत त्याने दमदार पुनरागमन केले. भारताला २०११ मध्ये विश्वकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवराजने २९६ वन-डे सामन्यांत ३६.८० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
मोहम्मद शमी :
दोन वर्षांनंतर प्रथमच वन-डे खेळणार. फिटनेस नेहमीच
चिंतेचा विषय. याच कारणामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी
मालिकेला मुकावे लागले. आतापर्यंत ४७ वन-डे सामन्यांत २४.८९ च्या सरासरीने ८७ बळी.
रवींद्र जडेजा :
दुखापतीतून सावरल्यानंतर आयपीएलमध्ये सहभाग. आयपीएलमध्ये छाप सोडता आली नसली, तरी इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरीची आशा. १२९ वन-डे सामन्यांत १८८८ धावा व १५१ बळी.
उमेश यादव : अचूक मारा करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. आयपीएलमध्ये १३ बळी घेतले आहेत. वन-डेमध्ये ६३ सामने खेळताना ८८ बळी घेतले.
भुवनेश्वर कुमार :
चेंडू स्विंग करण्यात वाक्बगार. त्यामुळे इंग्लंडमध्ये उपयुक्त ठरू शकतो. आयपीएलमध्ये आतापर्यंत हैदराबादतर्फे २१ बळी घेतले आहेत.
वन-डेमध्ये ५९ सामन्यांत ६१ बळी घेतले.
जसप्रीत
बुमराह : डेथ ओव्हर्समध्ये उपयुक्त. आतापर्यंत ११ वन-डे सामन्यांत २१.६८ च्या सरासरीने २२ बळी घेतले आहेत.
मनीष पांडे : अनेकदा संधी मिळाली असली, तरी संघातील स्थान पक्के करता आले नाही. आतापर्यंत १२ वन-डे सामने खेळताना २६१ धावा केल्या.
आश्विनची दुखापत गंभीर नव्हती. त्याला विश्रांतीची गरज होती. फ्रॅन्चायझीला आम्ही त्याला विश्रांती देण्याची विनंती केली. त्यांनी आमच्या विनंतीचा स्वीकार केला. भारताने खेळलेल्या अखेरच्या लढतीत आश्विन खेळला होता. त्याला विश्रांतीची गरज होती. तो फिट दिसत आहे. अन्य खेळाडूंप्रमाणे शस्त्रक्रियेनंतर त्याला रिहॅबिलिटेशनची गरज नाही.
- एम. एस. के. प्रसाद
भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहंमद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
राखीव खेळाडू : कुलदीप यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, शार्दूल ठाकूर आणि सुरेश रैना.

Web Title: Rohit Sharma, Shami's comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.