टीम इंडियाच वर्ल्डकप पटकावू शकतो
By Admin | Published: March 9, 2016 05:11 AM2016-03-09T05:11:05+5:302016-03-09T05:11:05+5:30
भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली
नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्व टी-२० स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी कर्णधारांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक व श्रीलंकेचा सनथ जयसूर्या यांच्यासह माजी दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेत यजमान संघ बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला.
या दिग्गज कर्णधारांव्यतिरिक्त माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग आणि जोगिंदर शर्मा व २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी जेतेपदासाठी भारताला पसंती दर्शवली आहे. या दिग्गज खेळाडूंनी टी-२० विश्वकप स्पर्धेबाबत दिल्लीमध्ये आयोजित एक कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.
सेहवागच्या मते यंदा भारताला विश्वकप पटकाविण्याची ९९ टक्के संधी आहे.
भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान १९ मार्च रोजी धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित लढतीबाबत बोलताना गांगुली म्हणाला, या लढतीत भारतीय संघ विजयाचा दावेदार राहील, तर काही प्रमुख खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर पाकिस्तान बाजी सरशी साधू शकतो, असे इंजमाम म्हणाला.
शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मते भारतीय संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. आशिया कप स्पर्धेत विजेतेपद पटकावताना भारतीय संघाने ते सिद्ध केले आहे. लक्ष्मण म्हणाला, ‘भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत असून, कामगिरीतही सातत्य राखले आहे. भारतीय संघात ‘मॅच विनर’ खेळाडू असून चांगले फिनिशरही आहेत. त्यामुळे उर्वरित संघाच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत भासत आहे.’
२००७ च्या विश्वकप स्पर्धेत विजयी चेंडू टाकणारा जोगिंदर शर्मा म्हणाला,‘भारतीय संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. जेतेपद पटकावण्याचा आम्हाला आत्मविश्वास होता.(वृत्तसंस्था)