टीम इंडियाची ‘विराट’ धावसंख्या

By admin | Published: October 10, 2016 04:15 AM2016-10-10T04:15:09+5:302016-10-10T04:17:02+5:30

कर्णधार विराट कोहलीचे दुसरे द्विशतक आणि अजिंक्य रहाणेची कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ खेळी या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या

Team India's 'Virat' score | टीम इंडियाची ‘विराट’ धावसंख्या

टीम इंडियाची ‘विराट’ धावसंख्या

Next

इंदूर : कर्णधार विराट कोहलीचे दुसरे द्विशतक आणि अजिंक्य रहाणेची कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ खेळी या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात विशाल धावसंख्या उभारली. भारताने पहिला डाव ५ बाद ५५७ धावसंख्येवर घोषित केला. कोहलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना २११ धावा फटकावल्या तर रहाणेने त्याला योग्य साथ देत १८८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने दिवसअखेर बिनबाद २८ धावांची मजल मारत सावध सुरुवात केली. आजचा खेळ थांबला त्यावेळी १७ धावा काढून नाबाद असलेल्या मार्टिन गुप्टीलला टॉम लॅथम (६) साथ देत होता.
कोहलीने ३६६ चेंडूंना सामोरे जाताना २० चौकार ठोकले तर रहाणेने ३८१ चेंडूंमध्ये १८ चौकार व ४ षटकार मारले. कोहली बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रोहित शर्मा (नाबाद ५१ धावा, ६३ चेंडू) आणि रवींद्र जडेजा (नाबाद १७) यांनी ५९ चेंडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची नाबाद भागीदारी केली असताना कर्णधार कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. रोहितची ही सलग तिसरी अर्धशतकी खेळी ठरली. कोहली आणि रहाणे आज दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे ‘हीरो’ ठरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३६५ धावांची भागीदारी केली. भारतातर्फे चौथ्या विकेटसाठी ही सर्वोत्तम तर एकूण पाचवी सर्वोच्च भागीदारी ठरली. कोहलीने या खेळीदरम्यान विंडीजविरुद्ध नॉर्थ साऊंडमध्ये केलेल्या २०० धावांच्या तर रहाणेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध एमसीजीमध्ये केलेल्या १४७ धावांच्या खेळीचा वैयक्तिक विक्रम मोडला. कोहली कर्णधार म्हणून दोनदा द्विशतकी खेळी करणारा पहिला भारतीय ठरला.
कोहली व रहाणे यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवले. शनिवारी अखेरच्या सत्रानंतर रविवारी पहिल्या दोन सत्रात त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.
३ बाद २६७ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने पहिल्या सत्रात २७ षटकांत विकेट न गमावता ९१ धावांची तर दुसऱ्या सत्रात ३० षटकांत ९८ धावांची भर घातली. कोहली-राहणे जोडीने भारतातर्फे चौथ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम नोंदवला. यापूर्वी सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी जानेवारी २००४ मध्ये एससीजीवर ५५३ धावांच्या भागीदारीचा विक्रम नोंदवला होता. आज कोहली-रहाणे जोडीने हा विक्रम मोडला.
आॅफ स्पिनर जीतन पटेलने (२-१२०) चहापानानंतर कोहलीला पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. कोहली माघारी परतल्यानंतर रहाणे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या (२-११३) गोलंदाजीवर यष्टिरक्षक वॉटलिंगकडे झेल देत माघारी परतला. रहाणेने २९ व्या कसोटी सामन्यांत आठव्यांदा शतकी खेळी केली.
त्याआधी, कोहलीने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर लाँग लेगला एकेरी धाव घेत कारकिर्दीतील दुसरे द्विशतक पूर्ण केले.
दरम्यान, खेळपट्टीवर नियमबाह्य पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जडेजाला पंचानी ताकीद दिली आणि त्याने दुसऱ्यांदा ही चूक केल्यामुळे पंचानी पाच धावांची पेनल्टी दिली. (वृत्तसंस्था)


कर्णधारपदी असताना दोन द्विशतके झळकावणारा कोहली हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. पहिले द्विशतक त्याने जुलै महिन्यात विंडीज दौऱ्यात झळकावले होते.
च्कोणत्याही कर्णधाराने न्यूझीलंडविरुद्ध एका डावात केलेल्या सर्वाधिक धावांचा विचार करता कोहली (२११) दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत सचिन अव्वल आहे. त्याने १९९९मध्ये अहमदाबाद कसोटीत २१७ धावा केल्या होत्या.
च्एकाच कसोटीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील भारतीय फलंदाजांनी दीडशेपेक्षा जास्त धावा फटकावण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी २००३-०४मध्ये सचिन (नाबाद २४१) आणि लक्ष्मण (१७८) या जोडीने आॅस्ट्रेलियात हा पराक्रम केला होता.
च्रहाणेने ८ वे कसोटी शतक झळकावताना आपली सर्वोत्तम खेळी केली. सहाव्या विकेटसाठी रोहित -जडेजा यांची नाबाद ५३ धावांची वेगवान भागीदारी.

च्कसोटीमध्ये एकाच वर्षी दोन वेळा दीडशेपेक्षा जास्त धावा करणारा विराट हा चौथा भारतीय कर्णधार. याआधीचे कर्णधार : विजय हजारे (१९५१), सुनील गावसकर (१९७८), अझरूद्दीन (१९९०)
च्भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावांची भागिदारी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराट-अजिंक्य यांनी स्थान मिळविले आहे. या यादीत ही जोडी पाचव्या स्थानी आहे.
च्पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सर्वोत्तम धावसंख्या नोंदविणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अजिंक्यने (१८८) सहावे स्थान मिळविले आहे. या यादीत २२४ धावांसह धोनी टॉपवर आहे.
च्या द्विशतकाआधी मायदेशात शतकाविना विराट एकूण १७ डाव खेळला. यापूर्वी फेब्रुवारी २०१३मध्ये आॅस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नई कसोटीत त्याने शतक झळकावले होते.
च्दीडशतकी खेळीसह अजिंक्य रहाणेने आपल्या कारकिर्दीतील २००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा ३६वा फलंदाज ठरला आहे.

कोहलीने वर्चस्व गाजवले - हेसन
विराट कोहलीने शानदार खेळी करीत अजिंक्य रहाणेच्या साथीने किवी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत बोलताना हेसन म्हणाले,‘दोघांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी आमच्या योजना अपयशी ठरवल्या. आमच्यासाठी हा खडतर दिवस होता, पण आमच्यासाठी काही सकारात्मक बाबीही घडल्या. दमट वातावरणात आमच्या वेगवान गोलंदाजांनी १३५-१४० किमीच्या वेगाने ३० षटके गोलंदाजी केली. आमच्या गोलंदाजांनी धावा सहज बहाल केल्या नाहीत. हे दर्जेदार कसोटी क्रिकेट असून याचे श्रेय गोलंदाजांना द्यायलाच हवे.’

भारत पहिला डाव :- मुरली विजय झे. लॅथम गो. पटेल १०, गौतम गंभीर पायचित गो. बोल्ट २९, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. सँटनर ४१, विराट कोहली पायचित गो. पटेल २११, अजिंक्य रहाणे झे. वॉटलिंग गो. बोल्ट १८८, रोहित शर्मा नाबाद ५१, रवींद्र जडेजा नाबाद १७. (अवांतर १०). एकूण १६९ षटकांत ५ बाद ५५७ (डाव घोषित). बाद क्रम : १-२६, २-६०, ३-१००, ४-४६५, ५-५०४. गोलंदाजी : बोल्ट ३२-२-११३-२, हेन्री ३५-३-१२७-०, पटेल ४०-५-१२०-२, सँटनर ४४-४-१३७-१, नीशाम १८-१-५३-०.



Web Title: Team India's 'Virat' score

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.