फिरकीच्या भूईचक्रात किवींचा धुव्वा

By admin | Published: October 29, 2016 02:07 PM2016-10-29T14:07:49+5:302016-10-29T20:07:04+5:30

अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर १९० धावांनी दणदणीत विजय मिळवला

Washing kiwis in spinning brown rice | फिरकीच्या भूईचक्रात किवींचा धुव्वा

फिरकीच्या भूईचक्रात किवींचा धुव्वा

Next
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 29 - अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर १९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाने तमाम भारतीयांना मालिका विजयाची भेट दिली. भारताने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली. भारताच्या २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा डाव अवघ्या ७९ धावात आटोपला. 
 
अमित मिश्रा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आपल्या फिरकीच्या तालावर न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवत मिश्राने पाच गडी बाद केले. पहिल्या षटकापासून भारताने न्यूझीलंडला धक्के द्यायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात उमेश यादवने गुप्टीलला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. 
 
बुमराह, यादवने टिचून मारा केल्यानंतर फिरकी गोलंदाजांनी कमालच केली. अमित मिश्राच्या हाती चेंडू आल्यानंतर संपूर्ण सामना भारताच्या बाजूने फिरला. ६-२-१८-५ असे मिश्राच्या गोलंदाजीचे पृथ्थकरण होते. अक्षर पटेलने दोन तर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि जे यादवने प्रत्येकी एकगडी बाद केला. अवघ्या ६६ धावात त्यांचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीलाच दोन दणके दिले. 
 
सलामीवीर गुप्टीलला उमेश यादवने भोपळाही फोड न देता तंबूत पाठवले. त्यानंतर संघाच्या २८ धावा असताना लॅथमला व्यक्तीगत १९ धावांवर जसप्रीत बुमराहने यादवकरवी झेलबाद केले. कर्णधार विल्यसनला २७ धावांवर अक्षर पटेलने केदार जाधवकडे झेल द्यायला भाग पाडले. 
 
रॉस टेलरला १९ धावांवर अमित मिश्राने यष्टीपाठी धोनकरवी झेलबाद केले. वॅटलिंगला भोपळाही फोडू न देता मिश्राने त्याच्या यष्टया वाकवल्या. 
 
शेवटच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २७० धावांचे आव्हान दिले आहे. सलामीवीर रोहित शर्मा ७०, विराट कोहली ६५, कर्णधारी धोनी ४१, केदार जाधव नाबाद ३७ आणि अक्षर पटेल २४ यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. 
 
भारताच्या डावात तीन महत्वपूर्ण भागीदा-या झाल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये दुस-या विकेटसाठी ७९, धोनी-कोहलीमध्ये तिस-या विकेटसाठी ७१ आणि अक्षर पटेल-केदार जाधवमध्ये तिस-या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी झाली. 
धोनी बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. सहाव्या विकेटसाठी केदार जाधव आणि अक्षर पटेलमध्ये झालेल्या भागीदारीमुळे भारताला २६९ पर्यंत मजल मारता आली.
 
न्यूझीलंडकडून बाऊल्ट-सोढीने प्रत्येकी दोन तर, नीशहॅम-सँटनरने एकगडी बाद केला. चार विकेट गमावून भारताने २०० धावांची वेस ओलांडली होती. विराट आणि कर्णधार धोनीची जमलेली जोडी सँटनरने फोडली. दोघांनी तिस-या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. 
 
त्याने ४१ धावांवर धोनीला पायचीत केले. त्यानंतर आलेला मनिष पांडे भोपळाही न फोडता लगेचच तंबूत परतला. त्याला सोढीने बाऊल्टकरवी झेलबाद केले. खेळपट्टीवर जम बसवलेला सलामीवीर रोहित शर्मा ७० धावांवर बाद झाल्यानंतर भरवशाचा फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारताचा डाव सावरला होता. भारताने ३४ षटकात १८० धावांचा टप्पा ओलांडला.  
 
न्यझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताला रोहित शर्माच्या रुपाने दुसरा धक्का बसला. भारताच्या डावाला आकार देणार सलामीवीर रोहित शर्मा ७० धावांवर बाद झाला. बाऊल्टच्या गोलंदाजीवर नीशॅमकडे त्याने झेल दिला.  
 
दरम्यान रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने शतकाची वेस ओलांडली होती. एकदिवसीय मालिका विजयासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 
 
सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी ४० धावांची सलामी दिली. अजिंक्य व्यक्तीगत २० धावांवर नीशॅमच्या गोलंदाजीवर लॅथमकडे झेल देऊन तंबूत परतला. 
 
पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले असून आजच्या सामन्यासह मालिका जिंकत भारतीय संघ दिवाळी गिफ्ट देतं का याकडे तमाम भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या सगळ्या खेळाडूंनी जर्सीवर आईचे नाव लिहत मातृप्रेमाचे दर्शन घडवले आहे.
 
न्यूझीलंडला पहिल्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकून इतिहास घडविण्याची संधी असेल. धोनीच्या नेतृत्वावर सध्यातरी संकट नसले तरी न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यास क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
भारताने धोनीच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यांत तीन एकदिवसीय मालिका गमावल्या. भारताचा बांगला देशकडून १-२ ने, ऑस्ट्रेलियाकडून १-४ ने आणि द. आफ्रिकेकडून २-३ ने पराभव झाला होता. १८ महिन्यांत केवळ झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकता आली होती.
 
न्यूझीलंडने या मालिकेत धर्मशाळा येथे पहिला सामना गमावल्यानंतर दिल्लीत कर्णधार केन विलियम्सन आणि रांचीत मार्टिन गुप्तिलच्या धडाकेबाज खेळीद्वारे विजय नोंदवीत मालिकेत चुरस निर्माण केली. विराटवर भारतीय संघ या मालिकेत विसंबून असलेला जाणवला. दुसरीकडे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेच्या सलामी जोडीने आतापर्यंत निराशच केले. रांची येथे रहाणेने अर्धशतक ठोकले, पण विराट बाद होताच मधली फळी कोसळली.

Web Title: Washing kiwis in spinning brown rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.